नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या नायब राज्यपालांवर निशाणा साधला आहे. यावेळी कारण होते ते नायब राज्यपालांनी केजरीवाल यांना पाठवलेल्या पत्राचे. केजरीवाल यांनी त्यांच्या खास शैलीत खोचक उत्तर दिले आहे.
पाणीपट्टी वाढल्याच्या विषयावरून राज्यपालांनी त्यांना पत्र पाठवले आहे.
त्याचा विधानसभेत उल्लेख करून केजरीवाल म्हणाले राज्यपालांच्या पत्रातील भाषा योग्य नव्हती. त्यांनी त्यात असे म्हटले आहे की विधानसभा अध्यक्षांना तुम्ही हे सांगा. राज्यपालांना कदाचित याची कल्पना नसेल की विधानसभा अध्यक्ष माझ्या अखत्यारित येत नाहीत.
अशा प्रकारची भाषा त्यांना शोभत नाही. दिल्लीचे सरकार काही काम करत नाही असेही राज्यपालांनी म्हटले आहे. आम्ही काहीतरी करत आहोत म्हणूनच तर आम्ही तीन वेळा निवडून आलो अशी टिप्पणी केजरीवाल यांनी केली.
महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात बोलताना केजरीवाल म्हणाले की २०१५ मध्ये सत्तेवर आल्यावर आम्ही महिला सुरक्षेसाठी पाउले उचलण्याचे आश्वासन दिले होते. दिल्ली पोलीस आमच्या अंतर्गत येत नाहीत.
मात्र तरीही आपल्या सरकारने जगात कुठेही नसतील एवढे सीसीटीव्ही कॅमेरे दिल्लीत लावले आहेत. सरकारने बसगाड्यांमध्ये मार्शल नियुक्त केले आहेत.
केवळ महिलांची सुरक्षा करणेच नाही तर अन्य गुन्हे रोखणे हाही त्यामागचा उद्देश आहे. ते पुढे म्हणाले की अपहरण झालेल्या मुलीच्या अपहरणकर्त्यांना या बस मार्शलनेच पकडून दिले होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मात्र चांगली चाललेली दिल्ली सरकारची ही योजना अचानक १ नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आली. आठ वर्षे ही योजना चालली आणि त्या काळात परिवहन, महसूल आणि वित्त या तीन विभागांत शांततेने काम सुरू होते.