मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. कहर म्हणजे हॅकर्सनी थेट राज्यपाल रमेश बैस यांना ईमेल पाठवून आमदारांवर कारवाई करण्याची विनंती केली.
पण राज्यपालांनी एखादी कृती करण्यापूर्वीच हॅकिंगचा हा प्रकार उजेडात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास आपला ईमेल हॅक झाल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर लगेचच त्यांनी मुंबईतील मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात यासंबंधीची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. हॅकर्सनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकृत ईमेलवरून राज्यपाल रमेश बैस यांना एक मेल पाठवला होता.
सदर मेलमध्ये गोंधळी आमदारांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. आमदार सभागृहात नीट वागत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी विनंती या मेलमध्ये करण्यात आली होती. हा ईमेल वाचून राजभवनाला संशय आला.
त्यांनी तत्काळ राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर नार्वेकर यांनी आपण अशा प्रकारचा कोणताही ईमेल पाठवला नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे पुढील अनर्थ टळला.
आपला ईमेल हॅक झाल्याचा प्रकार लक्षात येताच विधानसभा अध्यक्षांनी त्याची माहिती राजभवनाला दिली. तसेच पोलिसांनाही तशी खबर दिली. यामुळे राज्यपालांनी या प्रकरणी पुढील कोणतेही पाऊल उचलले नाही. या घटनेमुळे विधिमंडळाच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी हॅकर्सचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.