इंदापूर – इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे कामगारांच्या सुरू असलेल्या संपाबाबत आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी (दि. 12) नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला व कामगारांना न्याय देण्यासाठी तात्काळ बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी आजवर विधिमंडळात अनेक प्रश्न उपस्थित करून तालुक्यातील शेतकर्यांना व जनतेला न्याय दिला आहे.
त्यामुळे वालचंदनगर मधील सर्व कामगारांच्या नजरा आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे लागल्या होत्या. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार दत्तात्रय भरणे यांनी वालचंदनगर येथील कामगारांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. कामगारांच्या हितासाठी तात्काळ कंपनी प्रशासन, कामगार मंत्री व पालकमंत्री यांची बैठक कामगारांसमवेत घ्यावी व कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार भरणे यांनी यावेळी विधिमंडळात केली.
यावर लवकरच बैठक घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.त्यामुळे मागील 21 दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या 630 कामगारांच्या प्रश्नाबाबत विधिमंडळात आमदार भरणे यांनी आवाज उठवल्याने तालुक्यातील जनतेतून व कामगारांमधून समाधान व्यक्त होत आहे.