पुणे – श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीपातळीची मर्यादा ओलांडणारी मंडळे, त्यांना ध्वनीवर्धक यंत्रणा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आठ खटले दाखल केले.
कारवाई झालेल्यांमध्ये येरवडा, हडपसर, वानवडी, विमानतळ, चंदननगर, कोथरूड भागातील मंडळांचा समावेश आहे. पण, ही मंडळे कोणती याची नावे मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत. श्री विसर्जन सोहळ्यात विविध मार्गांवरील सुमारे 70 ते 80 प्रकरणे ध्वनीमर्यादा तपासण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा यांनी दिली.
विसर्जन मिरवणूक, तसेच उत्सवाच्या कालावधीत उच्चक्षमतेची ध्वनीवर्धक वापरल्याने नागरिकांना त्रास झाला होता. याबाबत सामान्य नागरिक, तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ध्वनीप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर नाराजी व्यक्त केली होती. ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती.
धडकी भरवणारा आवाज
निवासी क्षेत्रात सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत 55 डेसिबल आणि रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत 45 डेसिबल अशी ध्वनीमर्यादा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केली आहे. विसर्जन मिरवणुकीत सुमारे 130 डेसिबलची मर्यादा ओलांडण्यात आली होती. दरम्यान, सन 2018 मध्ये गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषणाचे 64 गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2019 मध्ये ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी 96 गुन्हे दाखल करण्यात आले होते.