कराड -सरकार कोणत्याही निवडणुका घेण्यासाठी घाबरत आहे. निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर करायच्या हा निर्णय निवडणूक आयोगाचा आहे. तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबतचा सर्वस्वी निर्णय पक्षश्रेष्ठींचा असून त्यांनी दिलेले उमेदवारच निवडणूक लढवतील. राज्यातील सर्वच प्रकारच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष तयार असल्याचे मत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
येथील विमानतळवर इस्लामपूर दौऱ्यादरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी मंत्री महाजन यांची भेट घेऊन स्वागत केले. याप्रसंगी माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एकनाथ बागडी, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील, अजय पावसकर, प्रमोद शिंदे, सत्यजित देशमुख, काकासाहेब ढेबे, प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर आदी. उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कार्यक्रमांना अनुपस्थित असल्याने ते नाराज असल्याचे वक्तव्य अनेकांनी केले आहे. याबाबत विचारले असता मंत्री महाजन म्हणाले, नाना पटोले, संजय राऊत, विजय वडेट्टीवार आदींनी याबाबतची वक्तव्य केली आहेत. परंतु, प्रत्येकजण आपाआपल्या परीने अर्थ काढत असून त्यात काहीही तथ्य नाही. काल अनेक कार्यक्रम झाले. अजितदादांची तब्बेत बरी नसल्यामुळे देवगिरी बंगल्यावरील कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे देव पाण्यात ठेवून आमच्यात फुट पडण्याचा अनेकांचा प्रयत्न असून आमच्यातील एकीमुळे विरोधक अस्वस्थ झाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
सरकारी रुग्णालय मृत्यूशय्येवर असल्याबाबतच्या खा. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना ते म्हाणाले, सध्या सामनाच व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. नांदेडमध्ये एका दिवसात 24-25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना चिंताजनक असून मी स्वतः आणि पालकमंत्र्यांनीही त्याठिकाणी भेट दिली आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफही त्याठिकाणी जाऊन आलेत. वाढत्या मृत्यूबाबत शासन गंभीर असून टीका करणारे करत राहतील, त्यांच्याकडून आम्हाला यापेक्षा काही वेगळी आशा नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
खोत व पडळकर यांची उपोषणस्थळी भेट
कराड प्रशासकीय कार्यालयासमोर दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अल्पसंख्याक संरक्षण व आरक्षण आदी. मागण्यांसाठी भारतीय संविधान घेऊन समता पर्व व समविचारी समाजबांधव बेमुदत उपोषणास बसले आहेत. उपोषणाच्या दुसर्यार दिवशी माजी मंत्री सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्तेंच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच या विषयावर वरिष्ठांकडे पाठपुरावा करु, असे आश्वासित केले.