नगर – नगर शहरातील उड्डाणपूल कधी होणार या प्रतीक्षेत एक तप निघून गेले तरी अजूनही उड्डाणपुलाचा सांगाडा उभा राहिला नाही. खासदार झाल्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी तातडीने पुलाबाबत दोन बैठका घेवून महिन्याभरात पुलाचे काम सुरू करण्याचे जाहिर केले होते. पण आज खा. डॉ. विखे देखील हतबल झाले आहेत. त्यामुळे नगर शहरातील उड्डाणपुल होण्यास नेमकी अडचण काय आणि ती कधी दूर होवून खऱ्या अर्थाने पुलाच्या कामाला सुरवात होईल. हे आता काळ सांगेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
उड्डाणपूल व्हावा ही नगरकरांची इच्छा नाही तर आज ती गरज झाली आहे. गेल्या महिन्यात नगर शहरातील वाहतूक कोंडी व अवजड वाहनांनी सात जणांचे बळी घेतले. आता आणखी किती बळी पाहिजेत, असा सवाल नगरकरांकडून होत आहे. या पुलाचे अनेक अडथळ्यांची शर्यत पार केली आहे. तरीही पूल उभारणीला काही मुहूर्त लागत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपूल उभारणीचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देण्यात आले. त्यासाठी केंद्र व राज्य मदत करीत असल्याचे सांगण्यात आले. पण तरी हा पूल ही उभा राहत नाही.
आजवर या पुलाच्या कामांचा शुभारंभ तीन ते चार वेळा करणार आहे. पण प्रत्यक्षात काम काही सुरू झाले नाही. उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. तरी काम सुरू होत नाही. त्यामुळे हतबल झालेल्या खा. डॉ. विखे यांनी आता या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तरी अजूनही काहीच बदल झालेला नाही. उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेगाने प्रयत्न सुरू करण्यात आले.
उड्डाणपुलासाठी भूसंपादनाचे कामही वेगाने सुरू आहे. मात्र, जोपर्यंत लष्कराची वर्किंग परमिशन मिळणार नाही, तोपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात अडचणी असल्याचे राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका आहे. खा. डॉ. विखे यांनी शहरातील उड्डाणपूल व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. लष्कराची जी जागा यासाठी आवश्यक आहे, त्याचे मुल्यांकन करून घेतले. पण आता लष्कराची जागा प्रथम महापालिकेला हस्तांतरित होईल, त्यानंतर ती महापालिकेकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित केली जाईल. या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने उड्डाणपुलाचा विषयाला विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.
खा. डॉ. विखे यांनी उड्डाणपुलासाठी दिल्ली वाऱ्या केल्या. पण अजूनही तो प्रश्न आहे तिथेत आहे. पुलाचे काम काही सुरू होत नसल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मते पुलासाठी आवश्यक असलेली सर्व जागा भूसंपादन झाल्याशिवाय निविदा प्रक्रिया राबविता येणार नाही. त्यामुळे कोणी काही म्हटले तरी, जोपर्यंत भूसंपादनाचा विषय पूर्णपणे मार्गी लागणार नाही. तोवर पुलाच्या कामाला सुरुवात होणार नाही. त्यामुळे भूसंपादनाचा विषय मार्गी लावणे आवश्यक आहे. तोपर्यंत नगराकरांना उड्डाणपुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारी काम अन् सहा महिने थांब असेच चालू राहिले तर पुलासाठी आणखी एक तप वाट पाहावी लागणार आहे.