भोर,(प्रतिनिधी) – मिरज येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या प्रकल्प बनविणे या स्पर्धेत भोर येथील राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक धांगवडीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले आहे. ओंकार खडपे, अंजली गायकवाड, आरती काशीद यांच्या संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
राजगड पॉलिटेक्निकच्या या विद्यार्थ्यांनी स्मार्ट बाईक या प्रकल्पात दुचाकी गाडी हिरो स्प्लेंडरमध्ये काही अपेक्षित बदल करून दुचाकी वाहनचालकास रस्त्यावरील खड्डे आणि अडथळे यांची जाणीव करून देत खड्ड्यांची नोंदणी करणे तसेच त्या अडथळ्यांची सूचना दुचाकीस्वारास आगोदर मिळत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी होण्यास मदत होईल.
तसेच अपघात झाल्यावर दुचाकीस्वाराच्या नातेवाईकांना तात्काळ तशा स्वरूपाचा संदेशसुद्धा या गाडीमार्फत पाठविला जाईल. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळणे सहज शक्य होईल, यामुळे या प्रकल्पास ‘स्मार्ट बाईक १२७४’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे पेटंट व्हावे यासाठी नोंदणी केली असल्याचे देखील विद्यार्थ्यांनी सांगितले.
या गाडीमार्फत जी काही खड्ड्यांची माहिती मिळेल त्या माहितीचा उपयोग सार्वजनिक बांधकाम विभागास खड्डे शोधण्यास आणि त्यावर उपाययोजना करण्यास फायदेशीर आहे. खड्ड्यांची संकलित केलेली माहिती सार्वजनिक बांधकाम विभागास देण्याच्या सूचना आमदार संग्राम थोपटे यांनी सुरुवातीला जेंव्हा हा प्रकल्प पाहिला तेव्हा दिल्या असल्याचे विद्यार्थांनी या वेळी सांगितले.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या बक्षिसामध्ये या तीनही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, चषक आणि रुपये ५० हजारांचा धनादेश या गोष्टींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल राजगड ज्ञानपीठाचे कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे, मानद सचिव स्वरूपा संग्राम थोपटे यांनी देखील विजेते विद्यार्थी, प्राचार्य ज्ञानेश्वर खोपडे, मार्गदर्शक प्रा. सागर उपाध्ये, प्रा.प्रीती जगताप, प्रा. अभिजीत साळुंखे, प्रा. रमीज डांगे, प्रा. सागर निगडे यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी राजगड ज्ञानपीठाचे डिग्री इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.संजय पाटील, इस्टेट मॅनेजर राहुल खामकर, डिप्लोमाचे प्राचार्य ज्ञानेश्वर खोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना अशा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे पॉलीटेक्निकचे प्राचार्य ज्ञानेश्वर खोपडे यांनी सांगितले.
असा आहे प्रकल्प
या गाडीमार्फत रस्त्यावरील खड्ड्ंयाची पूर्ण माहिती त्याचे गुगल मॅपवरील स्थळ निश्चिती, सुद्धा करता येणार आहे. प्रकल्पाच्या या विशेष बाबींसोबतच प्रकल्पामध्ये सौर उर्जेवर चालणारी कॅमेरा प्रणाली, रिमोटने सुरू आणि बंद करण्याची सुविधा, सौर उर्जेवर चालणारे सेंसर्ससोबतच विशेष महत्त्वाचे म्हणजे गाडी कुणी चोरल्यास तात्काळ स्मार्ट लॉक करण्याची यंत्रणा या गाडीमध्ये विकसित करण्यात आलेली आहे. प्रशासनासाठी सुद्धा हा अतिशय उपयुक्त असा प्रकल्प आहे.