नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कॉंग्रेस पक्षात सुरू झालेला संघर्ष आता विकोपाला गेला आहे. ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या नेतृत्वाच्या मुदद्दयावरून काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर अन्य ज्येष्ठ नेते चिदंबरम यांनीही संघटनात्मक दृष्ट्या कांग्रेस कमकुवत असल्याचे भाष्य केले होते. त्यावर पक्षाच्या नेतृत्वाकडून अथवा पक्षाकडून अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
मात्र लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधिररंजन चौधरी यांनी एका मुलाखतीत या नेत्यांना लक्ष्य केले होते. विशेषत: त्यांनी सिब्बल यांच्यावर रोष व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर आता सिब्बल गटही सरसावला असून त्यांनी नाव न घेता पुन्हा पक्षावर निशाणा साधला आहे.
पक्ष नेतृत्वावर टीका करणारे सिब्बल कधी बिहार अथवा मध्य प्रदेशात पक्षाच्या प्रचारासाठी गेले होते का, त्यांनी हे वक्तव्य केलेच कसे हे त्यांनीच सांगावे. पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी काय केले हेही सिब्बल यांनी सांगावे अशी शाब्दीत तोफ चौधरी यांनी डागली होती. त्यावर सिब्बल गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
बिहार निवडणुकीतील प्रचाराच्या विषयावरून सिब्बल यांना लक्ष्य करणेच निरर्थक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अधीर रंजन चौधरी यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. ज्या 23 नेत्यांनी पक्षातील घडामोडींबाबत कॉंग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले होते, त्या नेत्यांना जाणीवपूर्वक प्रचारापासून दूर ठेवण्यात आले होते असा दावा या गटाने केला आहे.
काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसमधील 23 बड्या नेत्यांची स्वाक्षरी असलेले पत्र अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवण्यात आले होते. त्यात पक्षाच्या अंतर्गत घडामोडींकडे आणि राज्यांमध्ये झालेल्या पक्षाच्या दयनीय स्थितीकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्या पत्रावर ज्या नेत्यांची स्वाक्षरी होती, त्याच नेत्यांना आता दूर ठेवले जात असल्याचा सिब्बल गटाचा दावा आहे.
दरम्यान, चौधरी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याच ज्येष्ठ नेत्यांवर प्रहार केला होता. ज्यांना कॉंग्रेस पक्ष योग्य आहे असे वाटत नाही त्यांनी पक्ष सोडून अन्य पक्षात जावे अथवा स्वत:चा पक्ष स्थापन करावा असा सल्लाही चौधरी यांनी दिला होता. सिब्बल यांनी एसीमध्ये बसून काम करण्यापेक्षा जमीनीवर उतरून काम करायला हवे.
पक्षाच्या बळकटीसाठी त्यांनी आतापर्यंत काय काम केले हेही त्यांनी सांगावे असे चौधरी म्हणाले होते. तर माजी केंद्रीय मंत्री असलेल्या सलमान खुर्शिद यांनी शायरीद्वारे सिब्बल यांचे कान टोचले होते.