कोल्हापूर, (प्रतिनिधी) – शाळाबाहेरील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांना शैक्षणिक साहित्य मोफत देण्याची चळवळ कोल्हापुरात रुजतेय.विशेषतः डोंगरदऱ्या, वाड्यावस्त्यावरील विद्यार्थ्यांची होणारी पायपीट, शहराच्या तुलनेत त्यांना मिळणारे अपुरे शैक्षणिक साहित्य.गरीब घरातील मुलांची होणारी गैरसोय यावर उपाय म्हणून कोल्हापूरच्या अवघ्या पाच ते सहा तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत चार वर्षांपूर्वी सावली फाउंडेशनची स्थापना केली.
या तरुणांनी सावली फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील वाड्या- वस्त्यांवर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरवलं जातं. यामध्ये प्रामुख्याने वह्या,पेन,पाट्या, छत्री ,पेन्सिल,पुस्तक ,गाईड , जुन्या सायकली या गोष्टींचा समावेश आहे या कार्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरूनही अनेकांनी मदत केली आहे.
गेल्या चार वर्षापासून सावली फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या या चळवळीत आता 50 हून अधिक तरुण-तरुणी सहभागी झाले आहेत. हे तरुण सर्व सामाजिक कार्यामध्ये त्या हिरीरीने सहभाग घेतात. सावली फाउंडेशनने जमा केलेल्या सर्व वस्तूंचा वापर गोरगरीब जनतेला आणि विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी पुढाकार घेतला जातो. तसेच उत्तरोत्तर सावली फाउंडेशनचे काम वाढावं वृद्धिंगत व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात.
सावली फाउंडेशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. हे सर्व उपक्रम विनामूल्य असतात. विशेष म्हणजे या सावली फाउंडेशनच्या माध्यमातून जे तरुण एकत्र आले हे सर्व तरुण व्यावसायिक आणि काही तरुण यातील शिक्षण घेत आहेत. कोल्हापूरच्या सावली फाउंडेशनचा आदर्श घेऊन राज्यातील इतर ठिकाणी असणाऱ्या वाड्या-वस्त्यांवरील मुलांना देखील अशाच पद्धतीने शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्यास नक्कीच भावी पिढी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होईल यात शंका नाही.