काठमांडू -भारतीय यात्रेकरूंच्या बसला सोमवारी रात्री नेपाळमध्ये अपघात झाला. त्या अपघातात 2 यात्रेकरू मृत्युमुखी पडले, तर 21 यात्रेकरू जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
ओडिशाचे रहिवासी असणारे 60 जण नेपाळमध्ये यात्रेसाठी गेले होते. काठमांडूकडे निघालेली त्यांची बस काही काळासाठी रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्या बसला जोरदार धडक दिली. त्या धडकेमुळे बस सुमारे 20 मीटर फरफटत गेली.
त्या अपघातात दोघांचे जागीच निधन झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. बसला धडक देणाऱ्या ट्रकच्या चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. स्थानिक पोलीस त्याच्या मागावर असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.