नवी दिल्ली – केंद्र सरकारने अनलॉकच्या प्रक्रियेनुसार देशभरात शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी शिक्षण मंत्रालयाने सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.तसेच आधी मोठ्या वर्गाच्या आणि मग हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरु करण्यात येतील.
शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी तो निर्णय हा सक्तीचा नाही. राज्ये आपल्या राज्यात असलेल्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर पालकांची लेखी परवानगी घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल. मुलांना शाळेत येणे हे बंधनकारक नाही. मुले घरी राहून ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात, असेही या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेले आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर 2 ते 3 आठवडे मुलांना गृहपाठ देऊ नये, त्याचबरोबर मुलांचे मन:स्वास्थ्य योग्य राहील याचीही काळजी घेण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत. शाळांनीही स्वच्छता आणि करोनाचे सुरक्षा नियम कडकपणे पाळावे, असेही शिक्षण मंत्रालयाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपले वेगळे नियम करू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि आरोग्याची काळजी घेणे ही शाळांची जबाबदारी आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जो माध्यान आहार दिला जातो तो स्वच्छ, सुरक्षित असेल याचीही जबाबदारी राज्यांची आणि शाळांची असणार आहे.