पिंपरी – शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरंट, बार, फूडकोर्ट सोमवारपासून (दि. 5) 50 टक्के क्षमतेने सुरू झाले. निवासी हॉटेल्स, लॉजला यापूर्वीच परवानगी मिळालेली होती. निवासी वगळता अन्य हॉटेल आजपासून सुरू झाले. काही हॉटेलचालकांनी मात्र मनुष्यबळाअभावी व अन्य काही कारणांमुळे हॉटेल्स उघडले नाही.
सुरू असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांचा थंड प्रतिसाद पाहण्यास मिळाला. त्यामुळे “थोडी खुशी-थोडा गम’ असेच चित्र होते. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊन झाल्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना खुले ठेवण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यांना घरपोच पार्सल सेवेला मात्र परवानगी देण्यात आली. लॉकडाऊन सुरू होऊन सहा महिने उलटले आहेत. राज्य सरकारने 1 सप्टेंबरला जारी केलेल्या नियमावलीनुसार निवासी हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस यांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, रेस्टॉरंट, फूडकोर्ट, बार सुरू करण्यास मुभा दिलेली नव्हती. दरम्यान, आता सरकारकडून त्यासाठी नुकतीच परवानगी देण्यात आली. त्यानुसार आजपासून रेस्टॉरंट, फूडकोर्ट, बार सुरू झाले.
काही हॉटेलला “लॉक’च
लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले. हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला. व्यावसायिकांनी साफसफाई करून व उपलब्ध मनुष्यबळात हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू केले. परराज्यात गेलेले कामगार अद्याप परतलेले नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्याशिवाय, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हॉटेलचे सॅनिटायझेशन, साफसफाई, केवळ 50 टक्के क्षमतेनेच हॉटेल सुरू करण्यास परवानगी असल्याने काही हॉटेल व्यावसायिकांनी मात्र आज हॉटेल उघडलेच नाही.
ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद
हॉटेल व्यावसायिकांना आज पहिल्या दिवशी ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. करोनाच्या प्रादुर्भावामुळे कुटुंबियांसह हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्याची मानसिकता सध्या कमी झाली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, फुडकोर्ट सुरू झाले तरी हॉटेलमधील जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र पाहण्यास मिळाले नाही. केवळ नाश्त्याचे पदार्थ विकत घेतले जात होते.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये कुटुंबासह जेवण करण्यास येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अत्यल्प आहे. आज पहिल्या दिवशी केवळ 10 टक्के ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. परराज्यात गेलेले कामगार परतले नसल्याने बऱ्याच हॉटेलमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्याशिवाय, साफसफाई, हॉटेलचे सॅनिटायझेशन आदी कामे झालेली नाही. त्यामुळे काही हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवले आहेत.
– गोविंद पानसरे, कार्याध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन