वाघोली (पुणे) – केसनंद (ता. हवेली) येथे अनेक वर्ष प्रलंबित असलेला पाणंद रस्ता खुला करून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. खुला करण्यात आलेल्या पाणंद रस्त्यामुळे सुमारे तीनशे एकर क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
केसनंद येथील पूर्व व पश्चिमेकडील एकूण 300 एकर क्षेत्राला फायदेशीर असणाऱ्या अशा एका किलोमीटर लांबीच्या रस्त्यामुळे येथील 50 शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला आहे. या रस्त्याच्या शुभारंभप्रसंगी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका वैद्यकीय अधिकारी सचिन खरात, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, माजी सरपंच मिलिंद हरगुडे, तानाजी हरगुडे, एस. पी. हरगुडे, संतोष हरगुडे, सरपंच रोहिणी सचिन जाधव, उपसरपंच सुनिता दिनेश डांबरे, ग्रामविकास अधिकारी गणेश बालकोळी आदी उपस्थित होते. मागील पंधरा वर्षांपासून प्रथमच जिल्हाधिकारी केसनंद गावामध्ये आल्यामुळे यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे माजी उपसरपंच सचिन जाधव यांनी यावेळी सांगितले.
गावागावांत सलोखा व प्रगती साधण्यासाठी पाणंद रस्ते यासारख्या कामांबाबत शेतकऱ्यांनी हेवेदावे विसरून एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. त्याबरोबर करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे
पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेमध्ये अतिक्रमण रस्ता खुला करणे, कच्चा रस्ता तयार करणे व कच्चा रस्ता पक्का करणे या तीन घटकांचा समावेश आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित असते.
– विजयकुमार चौबे तहसीलदार, हवेली
गावातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, पथदिवे आदी मुलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहे. – रोहिणी जाधव सरपंच, केसनंद
अनेक वर्षांपासून प्रलंबित पाणंद रस्त्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटल्यामुळे साधारणतः 300 एकर क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. रस्ता खुला करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रमोद हरगुडे ग्रामपंचायत सदस्य केसनंद