शशिकांत भालेकर
पारनेर -पारनेर तालुक्यात कोरनाबाधित एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही. करोनाला तालुक्याबाहेर थोपवण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले असले, तरी यापुढील काळामध्ये मात्र या यंत्रणेला अधिक तत्पर व्हावे लागणार आहे. त्यातच खेडेगावांमध्ये बाहेरून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे करोनाला रोखण्यासाठी खेडेगावांवर लक्ष केंद्रित करावे लागणार असून, येथे मुख्य जबाबदारी ही गावचा मुखिया म्हणून सरपंचाकडे असणार आहे.
गावाला करोनापासून रोखण्यासाठी सरपंचांनी मुखियाच्या भूमिकेमध्ये येणे गरजेचे आहे. करोना काळामध्ये सरपंचांना गावपातळीवरील निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. करोना समित्यांचे अध्यक्षपद हे सरपंचाकडे आहे. त्यामुळे यापुढील काळामध्ये तालुक्यातील सर्वच सरपंचांनी दक्ष राहून करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी ज्या ठोस भूमिका घ्यायच्या आहेत, त्या घेतल्या पाहिजे.
गावातील गट-तट बाजूला ठेवून मुखियाच्या भूमिकेतून गावाकडे लक्ष दिले पाहिजे. लॉकडाऊन कधी संपेल, याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. मात्र लॉकडाऊन काळामध्ये शासनाने झोननुसार काहीअंशी सूट दिली आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये शहरी भागातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये प्रशासनाला अधिक तत्पर राहावे लागणार आहे.
खेडेगावांमध्ये करोना प्रतिबंधक समिती या आधीच नियुक्त केली होती. तसेच आता बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामसुरक्षा समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवणार असून, त्या नागरिकांना गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवून त्यांच्यावर समिती नजर ठेवणार आहे. सरपंचांना करोना ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष बनवले आहे.
करोनापासून गावाच्या सुरक्षेसाठी त्यांना पूर्ण अधिकार मिळालेले आहेत. गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर त्यांची नजर असली पाहिजे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवक समितीचे सदस्य आहेत. त्यांना सोबत घेऊन व काही स्वयंसेवक नियुक्त करून 24 तास गावावर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे करोनाला गावाबाहेर ठेवण्यासाठी या समित्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे या समित्यांची जबाबदारी खऱ्या अर्थाने सरपंच असलेल्या मुखियांवरच आहे.
पूर्वीच्या काळामध्ये गावात मुखियाला खूप मोठा मानसन्मान मिळत असे. तो आपल्या गावची सर्व संकटे निवारण्यासाठी प्रयत्न करत असे. आताही गावच्या सरपंचाला करोनाला रोखण्यासाठी स्वतः मुखियाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. ज्या गावातील सरपंच ही जबाबदारी योग्य रीत्या पार पाडील, ते गाव करोनाला गावाबाहेर रोखण्यात यशस्वी होईल.
ज्योती देवरे , तहसीलदार, पारनेर