झारखंड निकालावरून शिवसेनेची भाजपवर टीका
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले आहे. त्यातच आता काल झारखंड विधानसभेचा निकाल समोर आला आणि पुन्हा एका राज्यात भाजपचे पाणीपत झाले. दरम्यान, आता याच निकालावरून शिवसेनेने भाजपवर कडाडून टीका केली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत 65 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपला 25 जागा मिळवता आल्या. 2014 च्या निवडणुकीत भाजप 37 जागांवर विजयी मिळाला होता. यावरून शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. भाजपाने आता झारखंडही गमावले. हे असे का? याचा विचार करतील अशी त्यांची मानसिकता नाही. जनतेला गृहीत धरले की, वेगळे काय घडणार!, भाजपची घोडदौड अनेक राज्यांत लंगडी पडली हे चित्र विचार करायला लावणारे आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
सोमवारी झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. भाजपाने महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमधील सत्ताही गमावली. विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने 47 जागाजिंकत भाजपचा धुव्वा उडवला. नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे भाजपच्या हिंदू मतदानाचा टक्का वाढेल अशी त्यांची धारणा होती, पण झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भूलथापा व आमिषांना बळी पडण्याचे नाकारले हे सत्य स्वीकारावे लागेल. लोकांनी ठरवले की ते सत्ता, दबाव व आर्थिक दहशतवादाची पर्वा करीत नाहीत. हवा तो बदल घडवून आणतात. महाराष्ट्रात ते झालेच. झारखंडही बेडरपणे बदलाला सामोरे गेले.
झारखंडमध्ये मोदी व शहा यांनी सभा घेतल्या. मोदी यांच्याच नावावर मते मागितली. गृहमंत्री अमित शहा यांची झारखंडच्या प्रचार सभेतील भाषणे तपासली तर तेथे सरळ हिंदू-मुसलमान असा भेद करायचा प्रयत्न होता हे स्पष्टपणे दिसते. लोकांनी एकदा ठरवले की ते सत्ता, दबाव व आर्थिक दहशतवादाची पर्वा करीत नाहीत. हवा तो बदल घडवून आणतात. भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. आता झारखंडही गमावले. हे असे का? याचा विचार करतील अशी त्यांची मानसिकता नाही, असे म्हणत शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडले. शिवसेनेने सामनाच्या संपादकीय मधून भाजपावर निशाणा साधला आहे.