कविता शेटे
सांगली – कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली, मिरज व राज्यातील इतर सर्वच भागात वाढणाऱ्या फेऱ्या यामुळे महाराष्ट्रातील महसूल मोठ्याप्रमाणात कर्नाटकात जात आहे. परिणामी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला याचा फटका सहन करावा लागत आहे.
1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतु कर्नाटक व महाराष्ट्र सीमाप्रश्न हा गेल्या साठ वर्षांत मार्गी लागलेला नाही. सीमावर्ती भागातील लोकांचे दैनंदिन व्यवहार हे महाराष्ट्रातील काही प्रमुख ठिकाणांवरून होत असतात. कर्नाटकातील कागवाड या तालुक्याला जवळचे मोठे शहर मिरज हे आहे. तसेच कर्नाटकातील अंकली, मांजरी, विजापूर, अथणी या भागातील नागरिक काही ना काही कारणास्तव सांगली व मिरजला येत असतात.
मुख्यत: यामध्ये मिरजेत असणारी दर्जेदार वैद्यकीय सेवा हीच आहे. दवाखान्याच्या माध्यमातून कर्नाटकातील शेकडो रुग्णांची दररोज मिरजेला ये-जो होत असते. तसेच सांगली मिरजेतील शाळा-महाविद्यालयात येणारे विद्यार्थी यांची संख्या देखील मोठी आहे. हे अगदी दररोज महाराष्ट्र कर्नाटक या सीमावर्ती भागातून प्रवास करत असतात. या लोकांना जिल्ह्यात वाहतूक सेवा देण्याचे काम कर्नाटक बस करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्याचा दुष्परिणाम महाराष्ट्राच्या महामंडळाला बसत आहे.
कर्नाटक महामंडळाच्या बस या अधिक आरामदायी आहेत. त्याचबरोबर त्यांचे प्रवास दर हे कमी आहेत. दिवसभरातून कर्नाटक महामंडळाच्या सांगली, मिरज या भागात तीनशे ते साडेतीनशे फेऱ्या होतात. यामध्ये कर्नाटकच्या महाराष्ट्रातील निवासी गाड्यांची संख्या देखील मोठी आहे. परिणामी महाराष्ट्र महामंडळाच्या फेऱ्यात 50 ते 60 असतात.
जलद सेवा मिळत असल्याने प्रवासी कर्नाटक बसला पसंती देतात. शिवाय कर्नाटकातून येणाऱ्या गाड्यांची कसलीही नोंद महाराष्ट्रतील आगार विभागात नाही. त्यामुळे दिवस भरात किती एसटी गाड्या येतात व किती गाड्या जातात याची लेखी नोंद नाही. ती घेणे आवश्यक आहे. राज्यातील इतर सर्वच भागात ही स्थिती आढळते पुणे, मुंबई, नाशिक अशा लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये ही प्रवाशांची पसंती कर्नाटक महामंडळाच्या बसला असल्याचे आढळते. गोव्याला जाण्यासाठी गोवा महामंडळाची एक मडगाव-मिरज फेरी आहे.
वरील सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील महसूल हा कर्नाटकात वळत आहे. व त्याचा फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला बसताना दिसत आहे. यावर योग्य ती उपाययोजना करून महाराष्ट्र महामंडळाने आधुनिकतेची जोड घेऊन प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करणे आवश्यक आहे. तरच महाराष्ट्रातील प्रवासाच्या पसंतीला आपली लाल परी उतरेल.
तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाला वाचवायचे असेलतर महाराष्ट्रातून कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शिवशाहीच्या मिरज-बेळगाव, सांगली-बेळगावच्या फेऱ्या सुरू केल्यास याचा फायदा एसटी महामंडळला होण्याची शक्यता आहे.
“हात दाखवा, गाडी थांबवा’चा एसटीला विसर
“हात दाखवा, गाडी थांबवा’ असे ब्रिदवाक्य महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केले होते. यानुसार बस स्थानक, स्टॉप वगळता कोठेही प्रवाशांनी हात दाखवल्यावर गाडी थांबविण्यात येणार होती. परंतु या ब्रिदवाक्याचे आता महामंडळाला विसर पडला आहे. स्थानकातून गाडी सुटल्यानंतर महामंडळाची गाडी कोणत्याही परिस्थितीत थांबविण्यात येत नाही. या उलट स्थानकातून बाहेर पडेपर्यंत कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या वाहकाकडून आरडा-ओरडा करून प्रवासी गोळा करण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे प्रवासी देखील महामंडळाच्या गाडीच्या नादाला न लागता कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच प्रवास करण्यास पसंती देत आहेत.