अडीच-तीन वर्षांपासून इमारत धुळ खात
नवीन इमारतीच्या अनेक भागात पक्षांची घरटी
रविंद्र वाळके
अवसरी (वार्ताहर) – अवसरी फाटा (ता. आंबेगाव) परिसरातील तांबडेमळा येथे सुमारे साडेतीन कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्चून अद्ययावत आणि प्रशस्त असा बस डेपो उभारण्यात आला आहे, परंतू प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अडीच-तीन वर्षांपासून ही इमारत धूळ खात पडली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी हा बस डेपो असून अडचण, नसून खोळंबा झाला आहे.
आंबेगाव तालुका हा दक्षिणोत्तर पुणे-नाशिक महामार्गावर पेठ ते वर्पे मळा कळंब आणि पूर्व पश्चिम लाखणगाव ते भीमाशंकर असा विस्तारला आहे. आंबेगाव तालुक्यात मंचर येथे मोठे एसटी बसस्थानक आहे. संपूर्ण तालुक्यात मंचर बस स्थानकावरूनच प्रवासी बस सोडल्या जातात.त्यासाठी मंचर बसस्थानकाला राजगुरूनगर आणि नारायणगाव आणि पुणे बस डेपोवर अवलंबून राहावे लागत आहे.
तालुक्यातील जनतेची अनेक वर्षाची मागणी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाकडे एसटी डेपोसाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मागणी केली होती. त्यानंतर डेपोसाठी जागेचा प्रश्न उपस्थित झाला. मंचर बस स्थानकाजवळ असलेली जागा अपुरी असल्याने अवसरी फाट्यावर तांबडे मळा हद्दीतील, जिल्हा दूध संघाच्या मागील जागा उपलब्ध झाल्यानंतर विधान सभाअध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून एस टी डेपोच्या कामास सुरुवात झाली.
गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजप सेनेचे सरकार असल्याने काम संथ गतीने चालले होते. तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुद्धा पाठपुरावा करून एसटी डेपोचे काम लवकर मार्गी लागण्यास प्रयत्न केले. तत्कालीन खासदार ही सेनेचे आणि राज्यात सरकार ही सेना भाजपचे असल्याने एसटी बसची उपलब्धता, आवश्यक असलेली यंत्रसामग्री, कामगार, अधिकारी उपलब्ध होतील आणि बस आगार चालू होईल, असे आबेगाव मधील जनतेला वाटले होते. परंतु तसे काही झाले नाही. गेल्या तीन वर्षात कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नेमणूकांबाबत निर्णय झालेला नाही, त्यामुळे आगार वापराविना पडून आहे. इमारतीच्या अनेक भागात पक्ष्यांनी घरटी केली आहेत. जमिनीवर सगळीकडे पक्ष्यांची विष्ठा पहावयास मिळत आहे. पाण्याची टाकी डबक्यात पडलेली आहे.
पुणे जिल्ह्यात जवळजवळ सर्वच तालुक्यासाठी स्वतंत्र आगाराची व्यवस्था या पूर्वीच झाली आहे.परंतू अनेक वर्षे आंबेगाव तालुक्याची मागणी असून देखील आगार नव्हते. भाजप – शिवसेना युती सरकारच्या काळात आगाराचे काम सुरू झाले. 2017 मध्ये इमारतीचे बांधकाम व इतर इमारतीची कामेही झाली. यंत्रसामग्री, नवीन एसटी गाड्या, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नेमणूका अद्याप झाल्या नसल्याने सदर डेपोचे उद्घाटन रखडले आहे.
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, प्रवाशांना मनस्ताप
मंचर बसस्थानकावरून तालुक्यात, पुणे व मुंबईला तसेच तालुक्याच्या इतर भागात जाण्यासाठी एसटी गाड्यांची संख्या अतिशय कमी आहे. विद्यार्थी, प्रवाशी, नागरिकांना बाहेर गावी जायचे असेल तर दररोज दोन ते तीन तास वेळ बसस्थानकावर ताटकळत उभे राहावे लागते. शिवशाही बस व इतर लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या मंचरला थांबत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सद्या राज्यात सेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून लवकरच एसटी डेपोची राहिलेली कामे मार्गी लागतील, अशी आशा नागरिकांना लागली आहे.