महापालिकेच्या दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात
नगर – जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करण्यासाठी असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरपालिका प्रवर्गातून पाच,तर महानगरपालिका प्रवर्गातून 14 जणांनी माघार घेतली. नगरपालिका प्रवर्गातून राष्ट्रवादीचे गणेश बाबासाहेब भोस यांचा एकमेव अर्ज राहिल्याने ते व मनपा प्रवर्गात महिला सर्वसाधारण गटात भाजपच्या आशा शिवाजी कराळे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने या दोन जागा बिनविरोध झाल्या. जिल्हा परिषद प्रवर्गातून राष्ट्रवादीचे धनराज शिवाजीराजे गाडे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती.
आता या मनपाच्या दोन जागांसाठी पुढील मंगळवारी,दि.24 नगर येथील महासैनिक लॉन येथे सकाळी 8 ते 5 या वेळात मतदान होईल, तर गुुरुवारी, दि.26 रोजी सकाळी 9 वाजता याचठिकाणी मतमोजणी होईल. मनपासाठी एकूण 68 नगरसेवक मतदार होते. त्यातील एकाचे सदस्यत्व रद्द झाल्याने आता 67 जण मतदानाचा हक्क बजावतील.
जिल्हा नियोजन समिती निवडणुकीसाठी पाच जागा आहेत.यात जिल्हा परिषद एक,नगरपालिका एक व महानगरपालिकेच्या तीन जागा आहेत. जिल्हा परिषदेसाठी धनराज गाडे यांनी एकमेव अर्ज नेला व दाखल केला होता. शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड आधीच झाली होती. त्यांचे वडील शिवाजीराजे गाडे यांचे निधन झाल्यामुळे या जागेची पोटनिवडणूक आहे.
नगरपालिकेसाठी गणेश बाबासाहेब भोस, आसाराम गुलाब खेंडके, शहाजी तुकाराम खेतमाळीस व रमेश झुंबर आढाणे (चौघे श्रीगोंदा) सूर्यकांत दत्तात्रय भुजाडी (राहुरी), मंदार सुभाष पहाडे (कोपरगाव) असे एकूण सहा अर्ज आले होते.आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी भोस वगळता पाच जणांनी माघार घेतल्याने भोस नगरपालिका प्रवर्गातून बिनविरोध निवडून आले. त्यांचे वडील बाबासाहेब भोस हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत.
महानगरपालिका क्षेत्रातून तीन जागांसाठी एकूण अठरा जणांनी अर्ज नेले होते.त्यात सर्वसाधारण महिला प्रवर्गातून मिना संजय चोपडा, ज्योती अमोल गाडे-कर्डिले, संध्या बाळासाहेब पवार,रूपाली निखील वारे, रिजवाना फारूक शेख, सुनिता शंकर कोतकर, आशा शिवाजीराव कराळे व सोनाली अजय चितळे असे आठ अर्ज दाखल झाले होते.त्यातील आज कराळे वगळता इतर सात जणांनी माघार कराळे यांची बिनविरोध निवड झाली.
मनपा क्षेत्रातील नागरिकांच्या मागास प्रवर्गातून अविनाश हरीभाऊ घुले,विनीत नाथ पाऊलबुध्दे,सुवर्णा दत्ता जाधव व मनोज लक्ष्मण दुलम असे चार जणांनी अर्ज दाखल केले होते.त्यातील घुले व दुलम यांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे पाऊलबुध्दे व शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांच्यात सरळ लढत होईल. तर,सर्वसाधारण प्रवर्गातून सुभाष सोपानराव लोंढे,अमोल शिवाजी येवले, सागर अर्जुन बोरूडे, सुनिल नारायण त्रिबंके, अनिल माधवराव शिंदे, मनोज शंकर कोतकर असे एकूण सहा जणांनी अर्ज दाखल केले होते.त्यातील लोंढे,बोरूडे,त्रिबंके व कोतकर यांनी माघार घेतल्याने येवले व शिंदे हे दोघे जण रिंगणात राहिले आहेत.
अशी असेल निवडणूक प्रक्रिया
आता केवळ मनपाच्या दोन जागांसाठी निवडणूक होईल. त्यात उमेदवाराला पसंतीक्रमाकांने मत द्यायचे आहे. पसंतीक्रमाकांच्या 51 टक्के मते घेणारा उमेदवार विजयी होत असतो. दोन-दोनच उमेदवार असल्याने जरी पहिल्या फे रीत पसंतीक्रमांक पूर्ण केला नाही तरी ज्याला जादा मते तो विजयी घोषित होईल. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते मोजण्याचा प्रश्नच येणार नाही. मतदाराने केवळ आकडी पसंतीक्रम लिहायचा आहे. अक्षरी वा नाव लिहिल्यास ते मत बाद होईल.तसेच पहिला वा इतर पसंतीक्रमांक दोन्ही उमेदवारांना सारखाच दिल्यास ते मतही बाद होईल. बॅलेटपेपवर निवडणूक होईल. यात पक्षीय वा कोणतेही चिन्ह नसेल.