नगर – शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिस्थिती स्फोटक बनून गंभीर गोष्टी घडू शकतात. शहरातील या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, असे निवेदन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले.
निवेदनात म्हटले, येथील कापड बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतील ठराविक फेरीवाले, हातगाडीवाल्यांची अतिक्रमणे व्यापारी वर्गासाठी डोकेदुखी ठरत आहे. नुकत्याच झालेल्या एका घटनेत समाजकंटकांनी दोन व्यापाऱ्यांवर भरदिवसा चाकूने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे. व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त एकत्र येत कडकडीत बंद पाळून निषेध नोंदविला.
परंतु या घटनेने शहरात कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षभरात अशाच पद्धतीने व्यापाऱ्यांना मारहाण होण्याच्या तीन ते चार घटना घडल्या आहेत. अतिक्रमणांचा प्रश्न सोडविण्यासाठी मनपा प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. वास्तविक फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे शक्य असताना मनपा प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे.
पोलिस प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पोलीस प्रशासनाकडून सहकार्य केले जाते. मात्र मनपा आयुक्त हे कोणाच्या तरी दबावाखाली अतिक्रमणांचा बंदोबस्त करण्यास हालचाली करत नसल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. काही अपवृत्तींच्या वरद हस्तामुळे संपूर्ण शहरास वेठीस धरण्याचे काम केले जात असून, याला वेळीच आवर घातला पाहिजे.