नवी दिल्ली- “अम्फान’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पीडितांना मदतीसाठी कोणतीही कसर राहू दिली जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या चक्रीवादळामध्ये पश्चिम बंगालमध्ये किमान 12 जण ठार झाले आहेत आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची दृश्ये आपण वृत्तवाहिन्यांवर पाहिली असून या आपत्तीच्या क्षणी संपूर्ण देश पश्चिम बंगालबरोबर आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी सर्व ते सहकार्य आणि मदत केली जात आहे. तेथील परिस्थिती सर्वसामान्य व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके या चक्रीवादळाच्या प्रभाव असलेल्या भागामध्ये तैनात केली गेली आहेत.
वरिष्ठ अधिकारी बारकाईने परिस्थितीचे अवलोकन करत आहेत आणि पश्चिम बंगाल सरकारच्या समन्वयाने मदत कार्य करत आहेत. मदत आणि पुनर्वसनासाठी कोणतीही कसर राहू दिली जाणार नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले.