नवी दिल्ली – 2000च्या नोटेमुळे भ्रष्टाचार संपेल. आता म्हणत आहेत, 2000ची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपुष्टात येईल. यासाठी आम्ही म्हणतो की, पंतप्रधान शिकला-सवरलेला असावा. एक अडाणी पंतप्रधानाला कुणीही काहीही सांगते. त्याला काहीही समजत नाही. मात्र त्रास तर जनतेला सहन करावा लागतो, अशा शेलक्या शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली.
दोन हजारांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होत आहे. या निर्णयाची केजरीवाल यांनीही खिल्ली उडवली. दुसरीकडे कॉंग्रेस नेते पवन खेरा म्हणाले की, 8 नोव्हेंबर 2016चे भूत पुन्हा एकदा देशाची शिकार करण्यासाठी बाहेर पडले आहे.
निश्चलनीकरणाचा जो मोठा प्रसार झाला, ती या देशासाठी एक संस्मरणीय आपत्ती होती. 2000 च्या नोटांच्या लाभांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण केले होते. आज जेव्हा 2000 च्या नोटा बंद होत आहेत, मग त्या सर्व आश्वासनांचे काय झाले?, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
सरकारने या कृतीमागील उद्देश काय होता, हे सांगायला हवे. केंद्र सरकार लागोपाठ गरिबांच्या आणि जनतेच्या विरोधातले निर्णय घेत आहे. माध्यमे यावर प्रश्न विचारतील, अशी आशा बाळगतो. नाही तर जगात चीपची कमतरता भासत असल्यामुळे हा निर्णय घेतला, अशीही बतावणी माध्यमे करू शकतील. तसेच कॉंग्रेसचे खासदार मनिकम टागोर यांनी ट्वीट करीत म्हटले, दुसरा डेमो डिजास्टर “एम’ पासून सुरू होतो. एम म्हणजे मॅडनेस, असे म्हणत टोला लगाविला.