– अतुल कहाते
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या शब्दाचा वापर सर्वप्रथम 1956 मध्ये न्यू हॅम्पशर राज्यातील डार्टमालथ कॉलेजमध्ये झालेल्या एका परिषदेमध्ये झाला. यंत्रमानव म्हणजेच रोबोटची संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावरच आधारलेली आहे. काही वर्षांपूर्वी फेसबुक या सोशल मीडियाच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीमध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन यंत्रमानवांमध्ये एक अनोखा प्रकार घडला. हे दोन यंत्रमानव एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी एक नवी भाषा तयार करून त्यात संभाषण करण्याचा प्रयत्न सुरू केला. थोडक्यात, त्यांना भाषेसंदर्भात शिकवण्यात आलेल्या नियमावलींच्या बाहेरचे नियम त्यांनी स्वतःच घालून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या नियमानुसार ते एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी यंत्रमानव हा मानवावर वरचढ ठरणार अशी भीती व्यक्त केली गेली. “टेस्लाकार’ ऍलन मस्क याने अशा आशयाचे विधान केले होते. तत्पूर्वी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांनीही उद्याचे यंत्रमानव माणसाहूनही अधिक बुद्धिमान असतील का, अशी भीती व्यक्त केली होती. शिकण्याची क्षमता असणारे संगणकीय सॉफ्टवेअर म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हटले जात असले तरी या शिकण्यातून नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीत माणसासारखेच निर्णय घेण्याची क्षमता संगणकामध्ये येऊ शकते. यंत्रमानवांना भावना नसतात. मग हा माणसापेक्षा हुशार झालेला भावनाविहीन यंत्रमानव भविष्यात काय करेल याविषयी काहीच सांगता येत नाही.
“एआयचा गॉडफादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. जेफ्री हिंटन यांनीही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्यावर भाष्य करत “गुगल’मधून स्वतःहून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. हिंटन आणि त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी “एआय’ तंत्रज्ञानाला पायाभूत ठरेल, असे संशोधन केले आहे. मानवी मेंदूच्या संरचनेप्रमाणे अल्गोरिदमचे जाळे तयार करून संगणकाला “डीप लर्निंग’साठी सक्षम बनवणाऱ्या संशोधनाचे श्रेय हिंटन यांना जाते. चॅटजीपीटी तंत्रज्ञानाच्या निर्मितीत त्यांच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे. दशकभरापूर्वी सुमारे 4.5 अब्ज डॉलर खर्चून “गुगल’ने त्यांची कंपनी विकत घेतली होती. “गुगल’साठी “एआय’ तंत्रज्ञान विकसित करणे, हा हेतू अर्थातच त्यामागे होता. असे असताना या कामाबाबत खंत व्यक्त करून त्यांनी या तंत्रज्ञानाच्या संभाव्य धोक्यांकडे लक्ष वेधले आहे. “न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याचा इशारा देणाऱ्या लेखात त्यांनी “एआय’ हे समाजविघातक व्यक्तींच्या हातचे खेळणे बनू शकेल, अशी भीती व्यक्त केली आहे. जगप्रसिद्ध अब्जाधीश वॉरेन बफेट यांनी बर्कशायर हॅथवेच्या यंदाच्या वार्षिक बैठकीतही “एआय’विषयी चिंता व्यक्त केली आहे. एआय सर्व प्रकारचे काम करू शकते. मात्र, जेव्हा एखादे तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या गोष्टी करू शकते तेव्हा मला काळजी वाटते. कारण, या एआयवर नियंत्रण ठेवण्यात आपण अपयशी ठरणार आहोत त्यामुळे एआय हा मानवाच्या अस्तित्वाला धोका असून अणुबॉम्बसारखा आहे, असे बफेट यांनी म्हटले आहे.
शालेय-महाविद्यालयीन शिक्षणातून शिकवले जाणारे सर्व काही चॅटजीपीटीवर उपलब्ध असताना आम्ही शिकायचे कशासाठी, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांना एखादी असाइनमेंट दिल्यास तीही बिनचूकपणाने चॅटजीपीटी सोडवून देऊ शकतो. विद्यार्थ्यांना त्या वयात पदवी घेऊन पुढे जायचे असल्याने यातील धोका लक्षात येत नाही. शिक्षक शिकवतात ते सगळे काही चॅटजीपीटीवर आहे. त्यामुळे आपल्याला गरज भासेल तेव्हा आपण तेथून ते मिळवू. वास्तविक हा दृष्टिकोन पूर्णतः चुकीचा आहे. कारण ज्या चॅटजीपीटीवर विद्यार्थी असाइनमेंटपासून शिकण्यापर्यंत विसंबून राहात आहेत, त्यांना उद्याच्या भविष्यात नोकरी देणारे का कामावर घेतील? तेही चॅटजीपीटीकडूनच काम करून घेणार नाहीत का? पण ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे यातून मार्ग कसा काढता येईल आणि चॅटजीपीटीला जे शक्य होणार नाही त्याचा शोध कसा घेता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. हा विचार केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर संपूर्ण शिक्षण पद्धतीनेच करण्याची गरज आहे. यासाठी चॅट जीपीटीला सहजपणाने न जमू शकणारी विश्लेषणात्मक कौशल्ये कशी विकसित करता येतील हे पहावे लागेल. अन्यथा, शिकण्याची गरजच काय अशी भावना उद्याच्या पिढीमध्ये विकसित होत जाणे हे धोकादायक आहे. तंत्रज्ञानावरचे हे अवलंबित्व वैचारिक, बौद्धिक पंगुत्वाकडे नेणारे आहे.
जेफ्री हिंटन यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात आणखी एक धोका व्यक्त केला असून तोही असाच गंभीर आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासारखी एखादी व्यक्ती एआय तंत्रज्ञानावर आधारित यंत्रमानव विकसित करून त्यांना त्यांच्या पद्धतीने एखादे विध्वंसक कृत्य तडीस नेण्याच्या आज्ञा देऊ शकते, असे हिंटन म्हणाले. अशी स्वैरसंचाराची मुभा मिळालेले यंत्रमानव स्वत:ला अधिक बलशाली बनवण्यासाठी स्वत:च काम करतील, असे हिंटन म्हणाले. ही भीती शतशः खरी आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शस्त्रास्त्रांनी दिलेल्या सूचनांचा अन्वयार्थ लावून विशिष्ट परिस्थितीत आपोआप काही कृती केल्यास त्यातून मोठा संहार घडण्याची भीती नाकारता येणार नाही.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या अल्लाउद्दीनचा दिवा घासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा राक्षस आता बाहेर आलेला आहे. त्यामुळे सगळ्याच पातळ्यांवर आता नव्याने विचार करण्याची गरज आहे. उद्याच्या 10-15 वर्षांचा विचार करून मुलांना काय शिकवले पाहिजे, नेमक्या कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या असू शकतील, कुठे चॅटजीपीटीचा प्रभाव असूनही रोजगारनिर्मिती करता येईल, अशा दृष्टीने तो विचार झाला पाहिजे. मूळ शिक्षणापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. अन्यथा ते पंगुत्व आणखी वाढत जाईल. कारण एकीकडे मुलांमध्ये शिकण्याची आवड कमी होत चाललेले असताना हे तंत्रज्ञान अधिक प्रभावी होत चालले आहे. याबाबत आधी पालकांमध्ये आणि मुलांमध्ये गांभीर्याने जागृती झाली पाहिजे.
एआयबाबत सिंग्युलॅरिटी अशी एक संकल्पना मांडली जाते. त्यानुसार एक क्षण असा येईल की, एआय हे मानवी बुद्धीपेक्षा जास्त श्रेष्ठ ठरेल किंवा मानवी विचारशक्तीसारखी क्षमता त्यामध्ये विकसित झाली तर तो क्षण खूपच धोकादायक असेल. कारण आज आपण विचारल्यानंतर विचारेल तेवढेच तो सांगतो. पण उद्या त्याचे तोच ठरवून निर्णय घेऊन मोकळा झाला तर ते महाभयंकर ठरेल. स्टीफन हॉकिंग्ज यांनी हा क्षण 2040 च्या दशकात येईल असे भाकित वर्तवले होते. पण आजची एआयची प्रगती पाहता त्यापूर्वीच हे भाकित खरे ठरेल की काय अशी एकंदर परिस्थिती आहे.