किरण जगताप
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा लागणार कस
कर्जत – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. या बदलत्या राजकीय सत्ता समीकरणामुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणाबरोबरच कर्जत तालुक्यातील राजकारण देखील बदलणार आहे. भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्याच्या राजनीतीचा प्रभाव ग्रामपंचायतींच्या राजकारणापर्यंत पडणार आहे. कर्जतची बहुतांशी सत्ताकेंद्र ही भाजपकडे आहेत. मात्र आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत “महाविकासआघाडी’चा फॉम्यूला राबविल्यास भाजपची मोठी पंचाईत होणार आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ झाली.प्रा. राम शिंदे यांचा झालेल्या दारुण पराभवातून कर्जतच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. बारामतीचे पार्सल म्हणून हिनवलेल्या रोहित पवारांनी बाजी मारत भाजपच्या बालेकिल्ल्याला तब्बल 25 वर्षानंतर खिंडार पाडले. तालुक्यासह कर्जत शहरातून पवारांना मोठे मताधिक्य मिळाल्याने त्याचा परिणाम येत्या निवडणुकांत होणार आहे. त्यातच महाआघाडीतील शिवसेना व कॉंग्रेस यांची साथ मिळणार असल्याने भाजपचे सत्तेतील “अच्छे दिन’ संपणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्जत नगरपंचायत, पंचायत समिती, दूधसंघ, मार्केट कमिटीसह बहुतांशी ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत घटलेले मताधिक्य हे भाजपच्या नेत्यांसाठी धोक्याची घंटा आहे. पराभवाच्या धक्क्यातून मतदारसंघातील भाजप अजूनही सावरल्याचे दिसत नाही. आ. रोहित पवार यांनी मात्र नियोजनबद्ध पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. त्यातच त्यांनी येत्या निवडणुकीत आपल्याला नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवायची असल्याचे भाष्य करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
सत्तेतला पक्ष असल्याने राष्ट्रवादीला आता मोठी उभारी येणार आहे.कुरघोड्या आणि गटबाजीने अनेक वर्षे मागे पडलेल्या राष्ट्रवादीला आ. रोहित पवार यांच्या रूपाने एक बाणी नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे आता गटबाजी आणि कुरघोड्या करणारे प्रवाहाच्या बाहेर फेकला जाणार आहे. राज्यातील सत्तेमुळे शिवसेना आणि कॉंग्रेस यांची ताकदही वाढीस लागणार आहे. त्याचा परिणाम येत्या निवडणुकातील निकालांवर होणार आहे.