भोंग्यांच्या ‘राज’कारणामुळे पोलीस यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा आबाधित राखण्याची मोठी कसरत पोलिसांना करावी लागत आहे. दररोज दाखल होणारे गुन्हे, त्यांचा तपास, न्यायालयातील तारखांना हजेरी, गस्त आदी कामांवर या भोग्यांच्या राजकारणाचा परिणाम झाला आहे.
राज ठाकरे यांनी भोंग्याचा विषय लावून ठेवण्याचे जाहीर केल्यापासून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. शहरातील धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करणे, त्यावरील भोग्यांची माहिती घेणे, धर्मगुुरुंना विश्वासात घेणे, दोन्ही समाजातील संघटना आणि भाविकांची समजूत घालणे अशी तारेवरची कसरत पोलिसांना करावी लागली. इतकेच नव्हे, तर राज ठाकरे यांनी दिलेल्या कथित अल्टिमेटमच्या तारखेला पहाटे चार पासूनच शहरात कडक बंदोबस्त ठेवावा लागला होता. हा बंदोबस्त सलग 20 तास होता. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना डोळ्यांत तेल घालून पहारा करावा लागला होता. हे आंदोलन या पुढेही सुुरुच रहाणार असल्याचा इशारा दिल्यावर अद्यापही पोलिसांना संवेदनशिल ठिकाणी खडा पहारा ठेवावा लागला आहे. यामुळे दैनंदिन कामकाजास लागणारे मनुष्यबळ पोलिसांना बंदोबस्तावर खर्ची करावे लागत आहे. यामुळे गुन्ह्यांच्या तपासाला तसेच गुन्हेगारांचा माग काढण्यास खिळ बसली आहे.
भोंग्याच्या राजकारणामुळे एक प्रकारे पोलीस यंत्रणा वेठीस धरली गेली आहे. पोलिसांपुढे सर्वात मोठे आवाहन हे दोन समाजामध्ये सलोखा राखण्याचे निर्माण झाले आहे. पोलिसांनी दि. 4 मे चे आंदोलन अतिशय हुशारीने हाताळल्याने शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. यासाठी मागील दहा दिवसांपासून सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. राज ठाकरे यांनी आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे मात्र आणखी किती दिवस पोलीसांनी डोळ्यांत तेल घालून खडा पहारा द्यायचा हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. सर्वच पोलीस ठाण्यांतील बहुतांश कर्मचारी भोग्यांच्या अनुषंगाने कार्यरत आहे. यामुळे त्याचा परिणाम पोलीस ठाण्यांच्या कामकाजावर झाला आहे.