पुणे –जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी गट-गण रचनेचे प्रारुप आराखडे तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे शनिवारी (दि.7)सादर करण्यात आले. राज्य निवडणुक आयोगाने हे आराखड्याची प्राथमिक तपासणी, नकाशे, हद्दी यांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. हा सर्व आराखड्याची तपासणीसाठी काही दिवस लागणार आहे. या तपासणीनंतरच गट-गण रचनेचे आराखड्यावर नागरिकांना हरकती-सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध केले जाण्याची शक्यता आहे.
नवीन नियमानुसार पुणे जिल्हा परिषदेमधील सदस्यांची संख्या 7 ने वाढणार असून 82 तर पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या 14 ने वाढणार असून 164 इतकी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दि.4 मे 2022 रोजीच्या निकालानुसार प्रभाग रचनेचे कार्यवाही ज्या टप्प्यावर होती. तेथपासून पुढे आयोगाने कार्यवाही सुरू ठेवावी. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचे कामकाजावर कार्यवाही करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला आवश्यक ती माहिती दिली. जनगणनेची आकडेवारी, गण-गटांची गावनिहाय आकडेवारी आणि नकाशे यांची माहिती सादर केली. आता येथून पुढे निवडणूक आयोग कार्यवाही करणार आहे.