राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा आरोप
पिंपरी – पिंपरी चिंचवडमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. काहीवेळा ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.
महापौर माई ढोरे यांनीही करोनामुळे वाढलेल्या मृत्यू संख्येवर संशय व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी आयुक्तांना अनेक प्रकरणांचा खुलासा मागवून प्रशासनासोबत सत्ताधारीचे सूर जुळत नसल्याचे स्पष्ट केले आहे. सत्ताधारी व प्रशासनाच्या गोंधळात सामान्य जनता भरडली जातेय, याला जबाबदार कोण असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाला घेरले असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महापालिकेने रविवारी दि. 2 ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ वाजता 8 करोना रुग्णांचा मृत्यू दर्शवित पहिल्या प्रेसनोटमध्ये एकूण मृत्यूची आकडेवारी 457 दिली. पालिकेच्या डॅशबोर्डवर मृत्यू संख्येत तफावत दिसल्याने रात्री साडे नऊला दुसरी प्रेसनोट काढून ती 20 ने वाढवत मृत्यूची आकडेवारी 477 दिली. त्यामुळे दिवसभरात किती जणांचा मृत्यू झाला यावर वैद्यकीय विभागातील विक्रम काटकर यांच्या सांगण्यानुसार व वैद्यकीयकडून आलेल्या अहवालानुसार 28 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
सत्ताधारी पक्ष करोनाची आधुनिक वॉररूम बनवली असल्याचा दावा करते. पालकमंत्र्यांच्या व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागणीवरून खासगी रुग्णालयामध्ये उपलब्ध बेडची संख्या पालिकेच्या पोर्टलवर दिसत आहे, मात्र त्याचे श्रेय सत्ताधारी भाजपचे आमदार लाटताना दिसले. सत्ताधाऱ्यांकडून प्रत्येक प्रभागात एक क्वॉरंटाइन सेंटर करणार असल्याची घोषणा केली. परंतु ही योजना एकाच विधानसभा मतदारसंघात राबवली जात आहे. तीनपैकी एकाच मतदारसंघात लक्ष दिल्यास करोना प्रभाव कमी होणार नाही.
सल्लागारांच्या जीवावर प्रशासन
भाजपने अनेक कामासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करून कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. त्यांच्याकडून करोना महामारी कालावधीत कोणताही सल्लागार न नेमल्यामुळे प्रशासनात गोंधळ सुरू आहे. खासगी हॉस्पिटलकडून करोनाच्या नावाखाली लूट सुरू आहे. उपचार व बिलावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच करोना परिस्थिती हाताळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी तज्ज्ञ सल्लागार नेमावा नाहीतर सल्लागारांच्या जीवावर प्रशासन चालवणे बंद करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उच्च दर्जाच्या खरेदीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोध करणार नाही. मात्र करोनाआडून भ्रष्टाचार व राजकारणही खपवून घेणार नाही, असा इशारा वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.