भारत बांगलादेश दरम्यान आजपासून दिवसरात्र कसोटी
कोलकाता: ईडन गार्डन या देशातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर आजपासून गुलाबी पर्व अवतरणार आहे. या सामन्यासाठी हे मैदान नववधूसारखे नटलेले आहे. संपूर्ण शहराला गुलाबी छटा आली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून दोन कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू होत आहे. सामन्यातील पहिल्या चेंडूपासून भारतीय क्रिकेटच्या गुलाबी पर्वाची सुरुवात होत आहे.
भारताचा हा 540 वा कसोटी सामना ठरणार आहे. इंदोर येथील पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि 130 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नेहमी होत सलेल्या कसोटी सामन्यापेक्षा भीन्न या सामन्याचे नियम असणार आहेत. पारंपरिक कसोटी सामने लाल चेंडूवर खेळवले जातात मात्र दिवसरात्र कसोटी सामने गुलाबी चेंडूने खेळविले जातात.
विशेष व्यक्तींची उपस्थिती
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या सामन्यासाठी खास उपस्थित राहणार आहेत. महान गोलंदाज कपिल देव, लिटील मास्टर सुनील गावसकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह देशातील अनेक नामांकित व्यक्ती, कलाकार या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच देशातील विविध क्रीडापटूंचा यावेळी खास गौरव करण्यात येणार आहे.
प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून अशा सामन्यांमध्ये गुलाबी चेंडू वापरले जातात. आतापर्यंत कुकाबुराचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटप्रमाणेच याही कसोटीते 80 षटकानंतर नवा चेंडू घेता येतो. दिवसरात्र कसोटी सामन्यांतही सहा तास आणि 90 षटकांच्या मर्यादा असतात. फॉलोऑनचा नियम मात्र वेगळा आहे. पारंपरिक कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर 200 धावांची आघाडी असली तर फॉलोऑन देता येतो. दिवसरात्र सामन्यात हीच आघाडी 150 धावांची असते.
सामन्याची जय्यत तयारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयोजक बंगाल क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने केली आहे. हा ऐतिहासिक सामना यशस्वी व्हावा यासाठी सगळे घटक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.