जयपूर: बहुजन समाज पक्षाच्या राजस्थानातील सहा आमदारांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेली भाजप आमदार मदन दिलवार यांची याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या सहा आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे अशी मागणी भाजप आमदाराने सभापतींकडे केली होती.
पण त्यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही, असे कारण देत त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, दिलवार यांच्या अर्जावर सभापतींनी निर्णय दिलेला आहे त्यामुळे त्यांची येथील याचिका फेटाळण्यात येत आहे असे कोर्टाने नमूद केले.
राजस्थान विधानसभेत बहुजन समाज पक्षाचे सहा आमदार निवडून आले होते. त्या सर्व सहा आमदारांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला होता व या विलिनीकरणाला विधानसभेच्या सभापतींनी मान्यता दिली आहे.