– मिलन म्हेत्रे
पुणे : श्री क्षेत्र देहू येथील शिळा मंदीराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देहू संस्थानच्या वतीने देण्यात येणाऱ्या पगडीवरील अभंगाचे चरण बदलण्यात आले आहे. श्री क्षेत्र देहू मध्ये होणारा हा कार्यक्रम जगाला संदेश देणारा दिवस आहे. जगाला शांततेची गरज आहे. असा उद्दात हेतू घेऊन ” विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेद – भ्रम अमंगळ’ || हे नवीन अभंग चरण टाकण्यात आले असल्याची माहिती देहू संस्थानचे विश्वस्त नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यासाठी संस्थाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी थेट देशाचे पंतप्रधान येत असल्याने त्यांना संस्थानकडून तुकाराम महाराजांची पगडी भेट देण्यात येणार आहे. ही पगडी खास तयार करून घेण्यात आली होती.
“या बदलण्यात आलेल्या चरणातून जगाला शांतीचा, समता आणि सलोख्याचा संदेश तुकोबांनी दिला असून तो सध्याच्या स्थितीत समाजापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. या निमित्ताने संस्थानने हे नवीन अभंग चरण निवडले असून त्यानुसार पगडीवरचे अभंग चरणात बदल करण्यात आला आहे.
– नितीन महाराज मोरे ( देहू संस्थानचे विश्वस्त)
त्यावर आधी मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। या अभंग चरणातील “भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। हे अभंगाचे चरण टाकण्यात आले होते. मात्र, दौऱ्याच्या एक दिवस आधी हे अभंग चरण बदलण्यात आले असून आता या पगडीवर ” विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद – भ्रम अमंगळ’ ।। हे चरण असणार असल्याचे संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले.