कुकडी काठावर भरदिवसा घडला प्रकार : दोन जणांवर गुन्हा दाखल
टाकळी हाजी/ सविंदणे – जांबूत (ता. शिरूर) येथे भरदिवसा तलवार काढून धमकविण्याचा प्रकार घडल्याने परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहा वर्षांपूर्वी कुकडी काठ परिसरातील चार लोकांचे गॅंगवार झाले होते. त्यांची पुनरावृत्ती होईल काय, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
जांबूत (पंचतळे) येथे जागेच्या वादातून तलवारीचा धाक दाखवून धमकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्नेहल पवार व त्याच्या एका साथीदारासह गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी दिली. हा प्रकार मंगळवारी घडला आहे. सोशल मीडियावर दंबगगिरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मोतीराम लहू येवले (वय 55, रा. कावळ पिंपरी, ता.जुन्नर) यांनी तक्रार दाखल केली आहे. स्नेहल पवार व त्याचा 1 साथीदार (नाव माहीत नाही) याच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जांबूत मोठी बाजार पेठ आहे. येथील पंचतळे परिसरामधून बेल्हे जेजुरी हा महामार्ग जात आहे. जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. हा वाद जमीनीचा असला तरी त्याला वास मात्र दबंगगिरीचा व वाळुच्याच पैशांचा आहे. याच कारणावरून टाकळी हाजीचे सरपंच दिलीप चोरे व निघोजचे सरपंच संदीप पाटील वराळ गावच्या दोन सरपंच यांचा खून झाला. दोन्ही गावचे चांगले नेतृत्व गेले. शरद चौधरी खून प्रकरणालाही वाळुचाच वास होता.
त्यानंतर या भागात जनतेला त्रास देणाऱ्या सराईत गुन्हेगार बाबू शेंडी खून प्रकरण घडले. संदीप वराळ पाटील खून प्रकरणामधील मुख्य आरोपी प्रवीण रसाळ व साथीदार यांना अटक झाल्यामुळे परिसर सध्या शांत होता. मात्र, जांबूतमध्ये घडलेली घटना पुन्हा एकदा भूतकाळात घेऊन जाणारी ठरली आहे.
टाकळी हाजीचे सरपंच दिलीप चोरे यांच्या खूनाची पहिली ठिणगी जांबूत गावातच पडली होती. अनेकजण मुंबईमध्ये भाईगिरी करणारे भाई या परिसरात राहतात. चोरे यांच्या खुनामधील प्रमुख आरोपी प्रवीण निचित हा वडनेर गावचा होता. या खुनामधील आरोपी प्रवीण रसाळ आरोपांमधून सुटला. त्याने संदीप वराळ यांचा खून केला.
तो शेजारी निघोज गावचा होता. गुन्हेगारी घडली ती याच कुकडी नदी काठ परिसरात. तालुका, जिल्हा जरी वेगळा असला तरी प्रवृत्ती बळावत चालली आहे. ही घटना खूप वर्षांनी घडली. त्यांना वेळेत मुसक्या घालणे महत्त्वाचे असून येथील शेतकरी कष्टकरी आहेत. त्यांना शांतता हवी आहे.
जांबूत येथील भरदिवसा नंग्या तलवारी घेऊन फिरणाऱ्यांची सखोल चौकशी करीत आहे. या भागात गुन्हेगारी वाढू दिली जाणार नाही. गुन्हेगारीला पायबंद घालू.
– भगवान पालवे, सहायक पोलीस निरीक्षक, शिरूर.