सातगाव पठार भागातील उत्पादन घटणार : वातावरणातील बदलाचा परिणाम
पेठ – सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे. मात्र, सध्या एकसारखे धुके व खराब हवामान असल्याने करपा रोगाने हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान व उत्पादन घटण्याची शक्यता भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सध्या वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एकरी 30 ते 35 हजार रुपये खर्च करून कांदा लागवड केली आहे. अनेक शेतकऱ्यांचे कांदे काढणीस आली आहेत. काही शेतकरी कांदा लागवड करीत आहेत. सतत ढगाळ हवामान आणि धुके पडत असल्याने पिकांवर रोगराई पडत असल्याने त्यांना रोगराईपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना औषधांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे पिकाचा भांडवली खर्च वाढत आहे. कांदा पिकावर तर करपा रोगाचे मोठे संकटच जाणवत असल्याचे शेतकरी रोहिदास चक्कर पाटील व सोपानराव नवले यांनी सांगितले आहे.
सातगाव पठार भागात यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके चांगली येतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, सतत वातावरणातील बदलामुळे आता रब्बी हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. कांदा पिकाला करपा रोगापासून वाचविण्यासाठी विविध औषधांची फवारणी शेतकऱ्यांना करावी लागत आहे. मात्र, औषधांची किंमत वाढली असून वारंवार फवारणी करून खर्च वाढत आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण असल्याने जमिनीच्या आतमध्ये कांद्याची फारशी वाढ झाली नसल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.
ढगाळ वातावरणामुळे व धुके पडत असल्याने कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे रोगराईला आळा घालण्यासाठी महागडी रासायनिक खते, किटकनाशके, बुरशीनाशक आदी फवारणी खर्च वाढला असल्याने पिकाचा भांडवली खर्च देखील वाढतच चालला आहे. वातावरण अजून काही दिवस असेच राहिल्यास हे पिक हातचे जाते की काय, अशी भीती शेतकरी बोलून दाखवत आहेत.