महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीत गतवेळेपेक्षा चार कोटीहून अधिक रकमेची कर्जे माफ
संगमनेर (प्रतिनिधी) – महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा तालुक्यातील जिल्हा बॅंकेतील अल्पमुदत पीक कर्जदार 19 हजार 370 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यांनी घेतलेल्या कर्जाची मुद्दल आणि त्यावर झालेले व्याज मिळून एकूण 141 कोटी 95 लाख 12 हजारांची रक्कम कर्जमाफीसाठी पात्र ठरली आहे. तुलनेने महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीत गतवेळेपेक्षा चारपटीहून अधिक रकमेची कर्जे माफ होणार आहेत.
महाविकास आघाडी शासनाने शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा सहकरी बॅंकेच्या तालुक्यातील विविध 39 शाखा आणि 135 विविध कार्यकारी सोसायट्या यांच्याकडून पात्र 19 हजार 370 सभासदांनी उचललेल्या कर्जाचे व्याज मिळून एकूण 141 कोटी 95 लाख 12 हजार इतकी रक्कम थकीत आहे. सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार असल्याची माहिती तालुका उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली. यावितिरिक्त तालुक्यातील 18 राष्ट्रीय राष्ट्रीय बॅंका, ग्रामीण बॅंका यांचा अल्पमुदतीचे पीककर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची आकडेवाडी लवकच संबंधित बॅंकेत लावली जाणार असल्याचे ते म्हणाले. युती शासनाच्या काळात झालेल्या कर्जमाफीमुळे 2016-17 सालात मोठ्या प्रमाणात पीककर्जाचे वाटप करण्यात आले होते. कर्ज मंजुरी वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी जुनी कर्जे चुकती करत नव्याने अधिक रकमेचे कर्ज उचलली होते. परिणामी हा आकडा वाढला. मात्र, आता कर्जमाफीतून 141 कोटी 95 लाख 12 हजार जिल्हा बॅंकेस मिळणार असल्याने तालुक्यातील सर्व शाखांचे व्यवहार सुरळीत होणार आहेत.
युती शासनाच्या काळात अवघी 29 कोटी 35 लाखांची माफी
युती शासनाने मार्च 2016 अखेर थकीत असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयाची कर्जमाफी दिली होती. मात्र, त्यात अटी-शर्ती अधिक असल्याने जिल्हा बॅंकेतील 14 हजार 903 शेतकऱ्यांना अवघी 29 कोटी 35 लाख 94 हजार 176 रुपये कर्जमाफी झाली होती. तुलनेने महाविकास आघाडीची चारपट अधिक आहे.
आधार लिंक नसलेले 87 शेतकरी
जिल्हा बॅंकेतील अल्पमुदत पीक कर्जदार पात्र 87 शेतकऱ्याचे खाते आधार लिंक नाही. याबबत संबंधित शेतकऱ्याचे खाते आधार लिंक केले जात आहे. संबंधित शेतकऱ्यांची यादी जिल्हा बॅंकेच्या शाखेत लावली गेली आहे.