मुंबई : राज्यात दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही तेवढ्याच वेगाने मोठी वाढ होत आहे. दरम्यान, हीच परिस्थिती पाहता राज्य सरकारने लॉकडाउनचा कालावधी १५ मे पर्यंत वाढवला आहे. शिवाय, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास १ तारखेपासून सुरूवात झाली आहे. मात्र एवढे नियोजन करूनही राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ आणि मृत्यू काही कमी होताना दिसत नाही.
राज्यात मागील २४ तासांमध्ये ८०२ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ६३ हजार २८२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे. याशिवाय आज ६१ हजार ३२६ रुग्ण बरे देखील झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.२४ टक्के एवढे झाले आहे.
Maharashtra reports 63,282 new cases, 802 deaths and
61,326 discharges; active cases 6,63,758 pic.twitter.com/pceF6f4XMM— ANI (@ANI) May 1, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,६३,७५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
तर, पुणे शहरात दिवसभरात ४ हजार ६९ करोना बाधित रुग्ण आढळले. तर ६७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर एकूण बाधितांची ४ लाख २३ हजार ५८७ इतकी संख्या झाली आहे. आजपर्यंत ६ हजार ८६४ रूग्णांचा मृत्यू झाल आहे. तर आज ४ हजार ३३९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ३ लाख ७३ हजार ८१६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.