शिक्षणसंस्थांना प्रवेशाची चिंता : पालक, विद्यार्थ्यांमध्ये भीती
– व्यंकटेश भोळा
पुणे – यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यभरातील विविध भागांतून पुण्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 30 टक्क्यांनी घटण्याची चिन्हे आहेत. एकीकडे करोनामुळे शैक्षणिक संस्थांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यातच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार असल्याची चिंता शैक्षणिक क्षेत्राला भेडसावणार आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यासारख्या मेट्रो शहरांत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. करोना संकट येत्या एक-दोन महिन्यांत तरी नियंत्रणात येणार असल्याची चिन्हे नाहीत. यंदाचे शैक्षणिक सत्र करोनामुळे तब्बल दोन महिने पुढे ढकलले आहे. विद्यापीठ व महाविद्यालय सुरू होण्याची तारीख जाहीर केली असली, तरी त्याच तारखेला सुरू होतील, याविषयी शैक्षणिक घटकांना शाश्वती नाही. सर्वत्र अनिश्चितता असताना करोनाच्या संकटात पुण्यात शिक्षणासाठी मुलांना पाठविणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पालकांपुढे पडला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिंबायोसिस विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, भारती विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गोखले इन्स्टिट्यूट ही अभिमत विद्यापीठे आहेत. त्याचप्रमाणे फर्गसन, स. प. महाविद्यालय, सिम्बायोसिस कॉलेज, बीएमसीसी कॉलेज या स्वायत्त महाविद्यालयांसह सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, व्हीआयटी, सीओईपी, गरवारे, वाडिया, मॉडर्नसह अन्य नामांकित महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी राज्यातील विविध भागांतील विद्यार्थ्यांची पसंती असते. मात्र, यंदा विद्यार्थी प्रवेशासाठी पुण्यात येतील का, अशी भीती संस्थांपुढे निर्माण झाली आहे.
सध्या विविध विद्यापीठांचे ऑनलाइन प्रवेश सुरू झाले आहेत. त्यासाठी प्रवेश परीक्षांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करत आहेत. यात विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चित झाले, तरी पालकांची अजूनही मुलांना बाहेर पाठवण्याची मानसिकता नाही. अशा परिस्थितीत आरोग्याच्या दृष्टीने स्थानिक परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेण्यास पालकांचा आग्रह आहे.
सद्यःस्थितीत करोनामुळे पुण्यात येऊन शिक्षण घ्यायची पालकांनी मनःस्थिती नाही. मात्र, महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. या विद्यार्थ्यांना करोनाची भीती आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण देत त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र, एकूणच विचार करता करोनाचा फटका नव्या प्रवेशांना बसणार आहे.
– डॉ. शरद कुंटे, अध्यक्ष, डीईएस नियामक मंडळ