नवी दिल्ली: संपूर्ण भारताला चिंता वाटावी अशा टप्प्यावर करोनाचा फैलाव जाऊन पोहचला आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या बुधवारी 1 हजार 900 च्या जवळ पोहचली. त्या विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 या आजाराने आतापर्यंत देशात 55 जणांचा बळी घेतला आहे.
देशातील सर्वांधिक करोनाबाधित महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यापाठोपाठ केरळमध्ये 265 तर तामीळनाडूत 234 जणांना त्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांमधील करोनाबाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. तर गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि तेलंगणमधील बाधितांची संख्या 80 च्या आसपास आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.