मुंबई: राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात बुधवारी करोनाबाधित 33 नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील 30 रुग्ण मुंबईचे, पुणे येथील 2, तर बुलढाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या 335 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात करोनामुळे आज 3 मृत्यूंची नोंद झाली. यातील दोन मृत्यू मुंबईत झाले असून त्यापैकी एक 75 वर्षीय पुरुष आहे तर दुसरा 51 वर्षीय पुरुष आहे. याशिवाय 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू एक मृत्यू पालघर येथे झाला आहे. या तिन्ही रुग्णांनी कोठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही. आतापर्यंत राज्यात करोनामुळे एकूण 13 मृत्यू झाले आहेत.
राज्यात आज एकूण 705 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7126 नमुन्यांपैकी 6456 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 335 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 41 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 24 हजार 818 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 1828 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत, असे टोपे यांनी सांगितले.