- बाजारपेठा गर्दीने फुलल्या, सोशल डिस्टंसिंगचा नागरिकांना विसर
पिंपरी – करोनाच्या रुग्णांची संख्या आता झपाट्याने कमी होत आहे. यामुळे नागरिकांच्या मनातील भितीही कमी झाली आहे. सोशल डिस्टंसिंगचाही नागरिकांना विसर पडला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजरपेठा फुलल्या आहेत. दिवाळीतील गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत करोनाची लागण न झालेल्यांसाठी ही गर्दी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात आतापर्यंत जवळपास 88 हजार नागरिक बाधित आढळून आले असून दीड हजारांहून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला.
गेल्या काही दिवसांत करोना बाधित व बळींचा आलेख उतरत चालला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या चिंतेत काही प्रमाणात घट झाली. मात्र, दसरा होताच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळत आहे. बाधित अन् बळींची दररोजची संख्या घटल्याने नागरिकही जणू करोना संपुष्टात आल्याच्या आविर्भावात दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत.
शहरातील पिंपरी मार्केट, चिंचवडची गांधी पेठ, निगडी, भोसरी, वाकड, डांगे चौक, पिंपळे सौदागर, सांगवी या सारख्या भागातील दुकानांमध्ये नागरिकांची कपडे, घर सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. नागरिकांकडून मास्कचा तर दुकानदारांकडून सॅनिटायजरचा वापर होत असला तरी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडविला जात आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी आतापर्यंत घरांमध्ये सुरक्षित असलेल्या गृहिणी, ज्येष्ठ नागरिकही बाहेर पडत आहेत. ते घरांमध्ये असल्याने आतापर्यंत त्यांना करोनाची त्यांना लागण झालेली नव्हती. परंतु आता गर्दीमधून नागरिकांच्या घरापर्यंत करोना पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ज्यांना कोरोनाची बाधा झाली अन् त्यातून बरे झाले, अशांची रोग प्रतिकार शक्ती वाढलेली असून त्यांना तुलनेत कमी धोका आहे. मात्र, ज्यांना आतापर्यंत करोनाची बाधा झाली नाही, अशा नागरिकांना जास्त धोका असून त्यांनी संयम बाळगण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांत बाधित व बळींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने काहीसे सुखावलेली महापालिका व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांपुढे दिवाळीनिमित्त होत असलेल्या बाजारातील गर्दीने मात्र डोकेदुखी वाढविली आहे.
फटाक्यांच्या प्रदूषणाचा बाधितांवर परिणाम
फटाक्यांमुळे दरवर्षी जसा पशू पक्षांना त्रास होतो तसा दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणाचा फटका दम्याच्या रुग्णांना बसतो. तसेच करोनाचा थेट फुप्फुसावर परिणाम होत असल्याचे आतापर्यंत अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यामुळे फटाक्याच्या प्रदूषणाचा बाधितांवर किंवा जे करोनातून बरे झाले आहेत, त्यांच्याही आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.