सातारा (प्रतिनिधी) – महायुतीच्या सरकारमुळे सातारा-जावली मतदारसंघात चौफेर विकासकामे झाली आहेत. दोन्ही तालुक्यातील विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने आपल्याला भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. मोदी यांच्या सरकारमुळे आपल्या देशाच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला आहे.
आपला देश महासत्ता करण्यासाठी, देशातील गोरगरीब जनता, शेतकरी, कष्टकरी आणि तरुणांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मोदीजींचे हात बळकट करणे ही काळाची गरज आहे आणि त्याचसाठी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना विजयी करा, त्यांना आपल्या सातारा आणि जावली तालुक्यातून विक्रमी मताधिक्य द्या, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उदयनराजेंच्या प्रचारार्थ मेढा येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उदयनराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, सुनील काटकर, सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, सयाजीराव शिंदे, शिवाजीराव मर्ढेकर, लक्ष्मणराव कडव, एकनाथ ओंबळे, पांडुरंग जवळ,
गीता लोखंडे, कविता धनावडे, निर्मला दुधाणे, कांतीभाई देशमुख, दत्ता पवार, रवी परामणे, अंकुश शिवणकर, तानाजीराव शिर्के, विनोद वेंदे, अविनाश कारंजकर, अशोक भोसले, वीरेंद्र शिंदे, संदीप परमणे, समाधान पोकळे, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, दादा पाटील, बाळासाहेब पाटील, नाना पवार, विठ्ठल मोरे, रामभाऊ शेलार, तुकाराम धनवडे, सागर धनावडे यांच्यासह महायुतीमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ज्यांच्यामुळे आपल्या गावाचा आणि तालुक्याचा विकास झाला त्यांच्याच पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार यांच्या माध्यमातून मोठमोठी विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपल्याला शेकडो कोटींचा निधी सातत्याने उपलब्ध झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शेतकरी, गोरगरीब जनता यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. त्यामुळे संकुचित विचार करणाऱ्यांना थारा न देता आपण सर्वांनी मोदीजींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांना माझ्या मतदारसंघातून विक्रमी मताधिक्य देणार, हा माझा शब्द माझ्या सातारा आणि जावली तालुक्यातील जनतेने खरा करून दाखवावा.
मोदी सरकारकडे लोकहिताचा दृष्टिकोन
विरोधक स्वाभिमानाची भाषा करत लोकांना भावनिक करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. ज्यांना निवडणुकीपुरता जनतेचा कळवळा येतो त्यांना सत्तेपासून दूर ठेवणे आणि आपल्या गावाचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधणे महत्वाचे आहे. भावनेला हात घालून विकासकामे होत नाहीत, हे वास्तव कोणीही विसरून चालणार नाही.
व्यापक लोकहिताचा दृष्टिकोन मोदी सरकारकडे आहे. आपली आणि आपल्या देशाची प्रगती खुंटता कामा नये, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्या देशाची प्रगती अधिकाधिक झाली पाहिजे, हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून प्रत्यकाने कमळ याच चिन्हाला मतदान करा आणि उदयनराजेंना विक्रमी मतांनी विजयी करा, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.