राजेश टोपे ः 2019 मध्ये 11306 नागरिकांना कर्करोगाचा प्रादुर्भाव
रांजणी – राज्यात कर्करोगाचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. ही बाब चिंताजनक असून 2019 मध्ये कर्करोगाचा 11306 नागरिकांना प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे तर प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांपैकी सुमारे 5727 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे यांच्यासह काही सदस्यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर देताना कर्करोगाच्या रुग्णांची आकडेवारी स्पष्ट केली. गेल्या 4-5 वर्षात कर्करोगाच्या प्रमाणात वाढ झाली आहे; परंतु गेल्या दोन वर्षांत कर्करोगाची आकडेवारी पाहिली तर निश्चितच ती चिंताजनक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात 9 टक्के कर्करोगाचे रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवरील उपचारांच्या सुविधेबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी प्रश्न मांडला. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 11 जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
उर्वरित जिल्ह्यांमध्ये महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे सांगितले. ते म्हणाले रत्नागिरी येथील केमोथेरपी केंद्रात जानेवारी पर्यंत 45 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे.
राज्यातील 11 जिल्ह्यातील केमोथेरपी केंद्रातील फिजिशियन व स्टाफ नर्स यांना मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे 1 महिन्याचे केमोथेरपीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आतापर्यंत 16 जिल्हा रुग्णालयातील फिजिशियन व स्टाफ नर्सना प्रशिक्षण दिले असून 2020-21 पर्यंत उर्वरित जिल्ह्यातील फिजिशियन व स्टाफ नर्सना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षित मनुष्यबळाच्या उपलब्धतेनुसार केमोथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
-राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य