संगमनेर – हातगाड्यांसह पालिकेच्या आवारात घुसलेल्या जवळपास दहा ते बारा अतिक्रमणधारकांची मुख्याधिकाऱ्यांच्या एकाच आदेशाने पळापळ झाली. रुबाबात पालिका आवारात गेलेले अतिक्रमणधारक अचानक हातगाड्या घेवून पळताना पाहून पाहणारेही पोट धरुन हसत होते. हा प्रकार आज (दि. 6) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.
संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावर दवाखाने, बॅंका, प्रशासकीय भवन, समृद्ध बाजारपेठेचा नजारा दर्शविणारी अनेक दुकाने आहेत. त्यामुळे हा रस्ता शहरातील महत्वाचा रस्ता बनला. मात्र, याच रस्त्यावर असंख्य फळविक्रेते आणि अन्य दुकाने अतिक्रमण करुन व्यवसाय करणाऱ्यांचीही मोठी संख्या आहे.
पालिकेने अधुनमधून त्यांची मालकी हटवून खऱ्या मालकाचेही त्यांना दर्शन घडवले. आजही असेच दर्शन घडवण्याची योजना पालिकेच्या अतिक्रमण विभागाने योजली होती. मात्र त्याची खबर मिळाल्याने पालिकेचे पथक येण्यापूर्वीच आपण आपल्या व्यावसायिक अतिक्रमणांसह पालिकेत जावून साहेबांवर दबाव आणू अशी योजना या अतिक्रमणधारकांनी आखली आणि लागलीच त्यांची अंमलबजावणीही सुरु केली. एकामागून एक हातगाड्या घेवून नवीन नगर रस्त्यावरील हे सर्व अतिक्रमणधारक पालिकेच्या आवारात दाखल झाले.
हा सर्व प्रकार पाहून पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर संतापले. हा काय प्रकार आहे? येथे जिल्हा न्यायालय आहे, हे पालिकेचे मुख्यालय आहे, येथे तुम्ही तुमची व्यावसायिक वाहने घेवून येण्याचे कारण काय? अशा प्रश्नांची त्यांनी सरबत्ती केली. त्यांचे प्रश्न ऐकून अतिक्रमणधारक शांत बसले. त्यामुळे मुख्याधिकारी आणखी संतापले आणि त्यांनी अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुदाम सातपुते यांना जेसीबी बोलवा आणि ही सगळी वाहने दाबून जप्त करा असे फर्मान बजावले.
मुख्याधिकाऱ्यांच्या या एका शब्दाने तावातावाने पालिकेच्या आवारात घुसलेल्या अतिक्रमण धारकांची गाळण उडाली, आणि अवघ्या दोनच मिनिटांत आपल्या फळाच्या हातगाड्या, ढकलत्या पानटपऱ्या घेवून पळापळ सुरु झाली. योगायोगाने त्याचवेळी पालिकेच्या जेसीबीने नगर पालिकेच्या प्रवेशद्वारातून आत डोकावले आणि अनेकांना धस्स झाले. जेसीबी पाहताच पालिकेच्या आवारातून बाहेर पडण्यासाठी अतिक्रमणधारक (फेरीवाले) यांची जणू कोण आधी बाहेर पडेल याची स्पर्धाच लागली.