उत्तम पिंगळे
काल विसरभोळ्यांकडे गेलो तर सरांची धनत्रयोदशीची तयारी सुरू होती. मी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या व सरांच्या पाया पडलो. सरांनीही मला शुभेच्छा दिल्या. मग सर म्हणाले, झाली का एकदा निवडणुकीची धामधूम? मी मान डोलावली. सर म्हणाले की, धामधूम आपल्यासाठी संपली आहे पण नेत्यांचे काय? निकाल तर पाहात आहातच. आता सत्ता व मंत्रीपदासाठी धावाधाव सुरू होईल. त्यांना एकूणच दिवाळी निवांतपणे साजरी करणे शक्य होणार नाही.
आता तुम्हीच बघा अगदी निवडणुका सुरू होण्यापूर्वीपासून पाऊस होता व अजूनही आहे. पावसाने अगदी कहरच केला आहे. अशा वेळी धड नेत्यांना प्रचारही करता आला नाही. तिकीट वाटपाचे रुसवे फुगवे निकालात दिसतच आहेत. अनेक अपक्ष व बंडखोरही स्वबळावर निवडून आलेले आहेत. याचा अर्थ हे स्वतंत्र नेते असून त्यांचा नक्कीच विचार करावा लागेल. बहुतेक त्यांना पावन करून पक्षात घेतले जाईल पण त्यासाठी ते विचार करतील कारण एकदा पक्षात गेल्यावर बाहेर पडणे सहज शक्य नसते.
बाकी झाले गेले विसरून लोकांनी नवीन प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत. बहुतेक आहे तेच सरकार राहील. याचा अर्थ एक असतो की बहुतेक गेल्या सरकारचे काम बऱ्यापैकी झालेले असून विरोधी पक्ष हवा तेवढा ताकदवान नाही. मला दोन्ही शक्यता पन्नास पन्नास टक्के वाटतात. सरकारचेही अर्धी काम चांगले झाले व विरोधी पक्षही अजून अर्धाच उभा राहिला आहे. म्हणूनच जोरदार टक्कर होऊन आहे तोच सत्ताधारी पुढे आला व सध्या तरी विरोधक मागे आहेत.
मग सर म्हणाले की, सुदृढ लोकशाहीसाठी मजबूत विरोधी पक्ष आवश्यक असतो.विरोधी पक्ष कमकुवत झाल्यास सरकार मन मानेल तसे कायदे करू शकते, जणू “हम करे सो कायदा.’ याचा परिणाम अशा सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडे होऊ शकते. असे होऊ नये म्हणूनच मजबूत असा विरोधी पक्षही आवश्यक आहे. विरोधी पक्षानेही याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण हार-जीत ही सुरूच असतेच आणि ज्यावेळी जे पदरात मिळेल ते घेऊन पुढे चालणे आवश्यक ठरते.
आता येणाऱ्या नवीन सरकारनेही आपल्या उणिवा दूर कराव्यात, सरकारचे सर्वच काही बरोबर असते असे नव्हे. किती वेळा विरोधकांच्या अभावी सरकार आपल्याला वाटेल तसे करून घेते. मग ते बरोबर असो वा चूक. आता नवीन सरकारने आपला कारभार कसा तत्पर होईल ते पाहावे. सरकारी कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे भरघोस पगारवाढ देताना त्यांच्याकडून चांगल्या कामांचीही हमी घेणे महत्त्वाचे ठरेल.
कृषी धोरण, कृषीभाव तसेच उद्योग चालना देणे महत्त्वाचे ठरेल. युवकांना रोजगार मिळत नाही अशा वेळी राज्यात कृषी उद्योग व लघुउद्योगांना प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरेल व हेच उद्योग विविध प्रकारचा स्थानिक रोजगार निर्माण करू शकतात. असंख्य नवनवीन तरुण सुशासित म्हणून बाहेर पडत असताना त्यांच्या समोर रोजगार नसणे भूषणावह नाही. नवे सरकार म्हणूनच चांगल्या लोकनिर्णयांची मुहूर्तमेढ रोवेल असा विश्वास वाटत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर बळीराजाचे राज्य येवो असा विश्वास सरांनी व्यक्त केला. पुन्हा एकवार म्हणाले की, दिवाळीच्या तसेच नूतन वर्षाच्या व नवीन सरकारासाठी शुभेच्छा.