सातारा – सेंद्रिय खते तयार करताना शेतातल्या काडीकचऱ्याचा वापर केला जातो. तो काडीकचरा एरव्ही वाया जात असतो. परंतु, त्यांचाच खत म्हणून वापर केल्यास रासायनिक खते विकत आणण्याची गरज भासत नाही. त्यातून शेतीचा पोत सुधारुन शेतकऱ्याचे अर्थकारणही उंचावते, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांनी व्यक्त केले.
देवापूर (ता. माण) येथील विषमुक्त व नैसर्गिक शेतीची संकल्पना राबवणाऱ्या उद्धव बाबर यांच्या सेंद्रिय शेतीच्या पाहणी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाणी फौंडेशनचे जिल्हा समन्वक मोहन लाड, शेतीतज्ज्ञ योगेश बनसोडे व शेतकरी उपस्थित होते. डॉ. पोळ म्हणाले, “”आजघडीला परिस्थिती पाहता विषमुक्त नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची गरज असल्याचे चित्र आहे. याचे पहिले कारण आहे आर्थिक आणि दुसरे आहे ते आरोग्याचे. रासायनिक खतांच्या वापराने शेतातल्या गांडुळांची संख्या कमी होते.
गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र असतो असे परंपरेने सांगितले जाते. मात्र, त्याकडे मधल्या काळात दुर्लक्ष झाले. गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र असतो या म्हणण्यात फार मोठा आशय सामावलेला आहे. अधिक उत्पन्नाच्या हव्यासापोटी शेतकरी मोठया प्रमाणात रासायनिक शेतीकडे वळला असून हे मानवास व पर्यावरणास धोकादायक आहे. या पध्दतीच्या शेतीमुळे जमिनीचे आयुष्यमान घटले असून पाणी व हवा प्रदुषित होत आहे.
यामुळे भविष्यात शेतीतील उत्पन्नही घटणार आहे. म्हणून विषमुक्त, नैसर्गिक व सेंद्रीय शेती अत्यंत गरजेची बनली आहे.” नैसर्गिक सेंद्रीय खते तयार करताना शेतातल्या काडीकचऱ्याचा व हिरवळीच्या खताचा तसेच त्याचबरोबर गोमुत्राचा व निबोळी अर्काचा वापर करण्याची गरज आहे, असे उध्दव बाबर यांनी सांगितले. रासायनिक खतामुळे, कीटकनाशक व तणनाशकामुळे जमिनीतील जीवाणूंची संख्या व कर्बाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नैसर्गिक भाज्यांचेही प्रमाण घटले असून त्याचा परिणाम माणसाच्या आयुष्यमानावर होऊ लागला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.