प्रगतिशील शेतकऱ्यांना पुरस्कारांचे वितरण
संगमनेर (प्रतिनिधी) –शेतकऱ्यांचे दोन लाखांचे कर्ज माफ झाले. परंतु दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे काय होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. परंतु दोन लाखांच्यावर ज्यांचे कर्ज आहे, त्यांचाही विचार महाविकास आघाडीचे सरकार करणार आहे. तसेच नेहमी कर्ज माफी करणं शक्य नसते. त्यामुळे कायमस्वरूपी पर्याय शोधणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या प्रगतिशिल शेतकरी व प्रगतिशिल गोपालक यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. ना. थोरात म्हणाले, मागील वर्षी सर्वसामान्य शेतकरी हा दुष्काळाने होरपळला होता. त्यातून सावरल्यानंतर पुन्हा अतिवृष्टीचे संकट आले. एका मागून एक आलेल्या संकटांमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला होता. त्यामुळे या शेतकरी सुखा झाला पाहिजे, यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. त्यासाठी एकाही शेतकऱ्याला रांगेत किंवा फॉर्म भरण्याची गरज पडली नाही. दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचाही प्रश्न सुटणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत. त्यांचाही विचार करण्यात येणार आहे. मात्र सरकार तरी किती वेळा कर्जमाफी करणार. यामध्ये शाश्वत उपाय शोधणे गरजेचे आहे. त्यावर राज्य सरकार काम करणार असून पुढच्या काळात हे काम करण्यात येईल.
यावेळी बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी सर्व शेतकऱ्यांना विषमुक्त शेती करून आपले आयुष्य कसे वाढवता येईल, हे पाहावे, असे आवाहन केले. आ. डॉ. तांबे, जि. प. अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, अनुराधा नागवडे यांचीही भाषणे झाली. यावेळी जालिंदर वाकचौरे, शांताबाई खैरे, आशाताई दिघे, सुप्रियाताई झावरे, दत्तात्रय काळे, भाऊसाहेब कुटे, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, रमेश देशमुख, शरद नवले, सीताराम राऊत, धनंजय गाडे, बाजीराव दराडे, पुरोषोत्तम आठरे, सोनालीताई रोहमारे, सुषमाताई दराडे, सोमिनाथ पाचारणे, श्याम माळी, अशोक पवार, रंजनाताई मेंगाळ, सुनंदाताई जोर्वेकर, सुनीताताई भांगरे, उज्ज्वलाताई डुबे आदी मान्यवर उपस्थित होते.