हिंगोली – शहरातील इंदिरागांधी चौक भागात एका महिलेच्या खून प्रकरणात तब्बल आठ महिन्यानंतर १० जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील इंदिरा गांधी चौक भागातील एका वसाहतीमध्ये शिवानी अजय चव्हाण या महिलेचा एका घरात गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. या महिलेच्या मृतदेहावर नांदेड येथील शासकिय रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाली होती.
दरम्यान, या महिलेची हत्या झाली की आत्महत्या याबाबत पोलिसांना संशय होता. त्यामुळे शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला होता. मात्र या महिलेचा खूनच झाल्याचा आरोप तिच्या कुटूुंबियांनी केला होता. या प्रकरणात मृत शिवानीच्या नातेवाईकांनी न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये शिवानी व तिचा पती अजय हे एका खून प्रकरणात तुरुंगात होते. शिवानीचा जामीन झाल्यानंतर ती पतीला सोडविण्यासाठी प्रयत्न करत होती. याबाबतचा राग मनात धरून तिला गळा दाबून खून केल्याचे म्हणणे मांडण्यात आले.
या प्रकरणात न्यायालयाने दिेलेल्या आदेशानंतर हिंगोली शहर पोलिसांनी शोभाबाई काळे यांच्या तक्रारीवरून सुरज मंजूऱ्या काळे, महादु सुरज काळे, राम मंगल चव्हाण, दिलीप रमेश चव्हाण, राहुल रोशन चव्हाण, बंटी सुरज चव्हाण, शिवा सुंदर पवार, भवान्या सुंदर पवार यांच्यासह अन्य दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस उपाधिक्षक मारोती थोरात, पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक सतीष ठेंगे, जमादार संंजय मार्के यांच्या पथकाने या परिसरात भेट देऊन आरोपींच्या अटकेसाठी शोध मोहिम सुरु केली आहे.