कोल्हापूर – सत्ता येते, सत्ता जाते पण सत्ता डोक्यात जाऊ नये. राज्यकर्त्यांचा संकुचित विचार हा देशहिताचा नाही, असा सज्जड दम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. या संकल्प सभेत त्यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे कोल्हापूर येथे संकल्प सभा झाली. येथील तपोवन मैदान येथे झालेल्या या सभेद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शक्तीप्रदर्शन केले. कोल्हापूर, सांगली, सातारासह राज्याच्या विविध भागातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संकल्प सभेला उपस्थिती लावली. संकल्प सभेला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. ईडीच्या कारवाईचा धाक दाखवून लोकप्रतिनिधींचा आवाज दाबला जात आहे. केंद्राने कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न करू दे, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते या कारवायांना पुरुन उरतील, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारला आव्हान दिले.
सध्या संघर्षाच्या कालावधीतून आपण सगळेजण पुढे जात आहोत. आज देश एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. दिल्लीत जे घडते त्याचा संदेश जगात जातो. मात्र आज दिल्लीही एकसंध नसल्याचे चित्र आहे. काही भागात दंगली घडल्या. यामुळे दिल्ली अस्थिर असल्याचा संदेश गेला. समाजातील सगळ्या घटकांना एकत्र घेऊन जाण्याची भूमिका प्रमुखाची असते. पण देशात आज वेगळेच चित्र आहे. माणसा-माणसांत अंतर वाढविले जात आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या प्रगतीची खबरदारी घेतली. पण 2014 पासून देशात वेगळेच चित्र आहे.
राज ठाकरेंना खरा महाराष्ट्र कळला नाही
राजर्षी शाहू महाराजांना अनेकांशी संघर्ष करावा लागला. त्यांनी सामान्य जनांचा कैवार कधी सोडला नाही. राज्य हे सामान्य माणसासाठी चालवायचे असते, असा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला नवी दिशा दाखवली. काही मंडळी आज, “शाहू-फुले-आंबेडकर’ यांचे नाव का घ्यायचे ? असे विचारतात. अशी विचारणा करणाऱ्यांना खरा महाराष्ट्र कळला नाही, अशा शब्दांत पवार यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला.