लखनौ – लखीमपुरी खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी आशिष मिश्रा याने आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शरणांगती पत्करली. सुप्रीम कोर्टाने त्याला मिळालेला जामीन रद्द करून त्याला एक आठवड्याच्या आता पोलिसांपुढे हजर होण्याची सुचना केली होती.
त्यानुसार त्याने आज ही शरणांगती पत्करली. स्थानिक कोर्टापुढे त्याने शरणांगती पत्करल्यानंतर त्याला लखीमपुर खेरीच्या तुरूंगात नेण्यात आले आहे. आशिष मिश्रा हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आहे.
त्याला अलाहाबाद हायकोर्टाने जामीन मंजुर केला होता. पण शेतकऱ्यांच्यावतीने त्याच्या जामीनावरील सुटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले गेले होते. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने आशिषला जामीन मंजुर करण्याच्या अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशावर नाराजी व्यक्त केली होती. ही आव्हान याचिका उत्तरप्रदेश सरकारनेच करणे अपेक्षित होते.
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीनेही राज्य सरकारला तशी शिफारस केली होती. पण राज्य सरकारने ती आव्हान याचिका सादर केली नव्हती. या प्रकरणातील साक्षीदारांवरही हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. त्यावरूनही सुप्रिम कोर्टाने नाराजी व्यक्त करून साक्षीदारांना पुरेसे संरक्षण देण्याची सुचना राज्य सरकारला केली आहे. लखीमपुरचे हे प्रकरण देशभर गाजले आहे.