खटाव – वडूज-पुसेगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी अरुंद पूल व धोकादायक वळणे आहेत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलांचे रुंदीकरण करावीत आणि धोकादायक वळणांवर सूचना फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
वडूज-पुसेगाव रस्त्यावरील अरुंद पूल व धोकादायक वळणांमुळे छोटे मोठे अपघात होत असून त्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. काही जण कायमचे जायबंदी झाले आहेत. यातील काही पूल तर ब्रिटिश आमदनीत बांधलेले आहेत. कित्येक ठिकाणी अरुंद पुलांवरील संरक्षक कठडे गायब आहेत तर काही ठिकाणी ते तुटलेले आहेत.
धोकादायक वळणांबाबत सूचना देणारे फलकही काही ठिकाणी गायब तर काही ठिकाणी ते पुसट झाले आहेत. या रस्त्याची दुरवस्था तर सर्वज्ञात आहे. बांधकाम विभागाने पॅचवर्क करून तात्पुरती मलमपट्टी केली आहे. मात्र, ती किती काळ टिकणार, हा संशोधनाचा विषय आहे.
लोकप्रतिनिधींनी याची गांभीर्याने दखल घेऊन रस्ता दुरुस्ती, पुलांचे रुंदीकरण व वळणांवर सूचना फलक लावले जाण्यासाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करावा. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रस्त्याची पाहणी करून पुलांच्या रुंदीकरणासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. अपघात होऊ नयेत म्हणून अरुंद पूल व धोकादायक वळणांचा अडसर दूर करून रस्ता वाहतुकीसाठी निर्धोक बनवावा.