मुंबई- सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकाहून एक हिट चित्रपट रिलीज होत असल्याचे दिसून येत आहे. अश्यातच आता चिमुरड्यांची एक सुंदर कथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘खारी बिस्कीट’ चित्रपट सध्या सर्वत्र हाऊसफुल आहे. दरम्यान, खारी बिस्कीटच्या टीमसाठी आणखी एक दुग्धशर्करा योग म्हणजे, आयएमडीबीवर चित्रपटाला 8.9 रेटिंग्स मिळालेली आहेत. त्यामुळे खरी बिस्किटाच्या संपूर्ण टीमला एक कौतुकाची थाप मिळाली आहे.
1 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला असून, खारीसाठी बिस्कीट आणि बिस्किटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त बिस्किटसाठी राजकुमारीचा हुकूम.
मात्र, खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. ही गोष्ट आहे या दोघांची. खरीचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटणाऱ्या बिस्किटची आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या खारीची. अशी चिमुरड्या भावंडांची जोडगोळी या चित्रपटात दिसून येत आहे. त्यामुळे ‘खारी बिस्कीट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहेत.