चंद्रकांत पाटलांची तरुणीला अब्रुनुकसानीची नोटीस
कोल्हापूर : सध्या राज्यातील सत्तास्थापनेवरून भाजप शिवसेनेत घमासान सुरु असताना भाजपचे प्रदशाध्यक्ष आणि कोथरूडचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील हे वेगळ्याच एका कारणाने चर्चेत आले आहेत. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातील एका तरुणीला अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे या नोटिसीची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपसारख्या पक्षातील जबाबदार व्यक्तीने हि नोटीस बजावली असल्याने नेटकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूकीत कोल्हापूरकरांनी भाजपला हद्दपार केल्यानंतर आमचं काय चुकलं असे म्हणत चंद्रकांत दादांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत ‘कोल्हापूरकर कधी सुधारणार नाहीत’ अशा आशयाची प्रेस नोट वाटण्यात आली होती. मात्र त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी जरी सारवा सारव केली असली तरी त्याच्या तीव्र प्रतिक्रिया कोल्हापुरात उमटल्या होत्या.
दरम्यान काँग्रेसची पदाधिकारी असलेल्या आणि व्यवसायाने वकील असलेल्या कल्याणी माणगावे यांनी एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करत चंद्रकांत पाटलांचा निषेध नोंदवला होता. मात्र चंद्रकांत पाटील याना ही बाब रुचली नसल्याने त्यांनी कल्याणी विरोधात अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. या नोटीसीद्वारे माफी मागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कल्याणीला ही नोटीस आल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही याची दखल घेत कल्याणीला आधार दिला आहे. दरम्यान दिवाळी पाडव्याच्या दिवशी कल्याणी यांनी हा व्हिडिओ पोस्ट करून ‘चंद्रकांत दादा तुम्ही सुधरा’ असा सल्ला दिला होता.
चंद्रकांत पाटील यांनी देखील अजित पवारांपासून राहुल गांधीं पर्यंत अनेकांबद्दल बेताल वक्तव्य केलेली आहेत. त्यापैकी कुणीही त्यांना नोटीस पाठवलेली नाही परंतु एका नव्याने पदवीधर झालेल्या तरुणीला नोटीस पाठवून चंद्रकांतदादा आपला पुरुषार्थ दाखवत आहेत का?. कोल्हापूरकरांची कितीही बदनामी झाली तरी त्यांनी गप्पच बसायचं का?. विरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणीला नोटीस बजावून तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायला ही आणीबाणी आहे का ? अशे अनेक सवाल कोल्हापूरकरांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.