नाशिक – नाशिकमध्ये झालेल्या बस जळीत दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.मृत्युमुखी पडलेल्यांची ही आकडेवारी आणखी वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी वाहनांची डिझेलची टाकी फुटल्याने अपघात झाला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. यादरम्यान एका आईने आपल्या मुलासह बसच्या खिडकीतून बाहेर पडत स्वतःचे प्राण वाचवले.
सकाळी साडे सातच्या सुमारास या महिला वाशीम येथून मुंबईकडे जाण्यासाठी आपला लहान मुलगा आणि इतर आणखी दोघांसोबत बसल्या होत्या. यावेळी गाडी पूर्ण प्रवाश्यांनी भरलेली होती अशी माहिती या महिलेने एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी आम्ही झीपेत होतो त्यानंतर जमलेल्या लोकांच्या मदतीने आम्ही बसच्या खिडकीतून बाहेर पडत प्राण वाचवल्याचे यावेळी या महिलेने सांगितले.
बसला आग लागल्याने अनेकजण गंभीररित्या भाजून निघाले होते, त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, मदतकार्य सुरू आहे.मदतकार्य सुरु असले तरी अपघात इतका भीषण होता की मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.